डोंगरपाल रस्त्यासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
वारंवार पाठपुरावा करूनही शासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी बांदा
डोंगरपाल येथील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून गेली अनेक वर्ष संबंधित विभागाकडे तसेच शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा याबाबत आश्वासना पलीकडे कोणतीही कारवाई झाल्यामुळे डोंगरपाल ग्रामस्थ संतप्त झाले आहेत या रस्त्याचे काम तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डोंगरपाल ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला आहे . यावेळी बोलताना डोंगरपाल येथील ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते गुणाजी गवस यांनी सांगितले की गेली अनेक वर्षे फकीरपाटा डोंगरपाल कळणे, रस्ता नंबर 119 या रस्त्याची दुरावस्था आहे. त्यासाठी 2023 मध्ये ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता.तेव्हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता करण्यात येईल असे त्यांना सांगुन एप्रिल 2024 पर्यंत रस्ता होईल असे आश्वासन देण्यात आले मात्र ते काम झालेच नाही. त्यामुळे 2024 मध्ये ग्रामस्थांनी पुन्हा 15 ऑगस्ट रोजी उपोषणचा इशारा दिला यावेळी अधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन सांगितले की रस्ता मंजूर झाला आहे उपोषण करू नये. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले .पुढे निवडणूक लागली व आचारसंहिता लागली त्यामुळे काम बारगळले. निकालानंतर निविदा निघाली चार जणांनी निविदा भरली व कुडाळ येथील व्यक्तीची मंजूर झाली. आराखडा तयार करून फाईल मंत्रालयात गेली परंतु तीन महिने काही कारवाई झाली नाही . त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी पालकमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले. हे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण व्हायचे होते. मात्र मे महिना लागला तरी रस्त्याची दुरावस्था कायम आहे त्यामुळे आता अपघात होऊन बळी जाण्याची वाट शासन पाहत आहे का असा सवाल त्यांनी केला यावेळी बोलताना बाबुराव परब म्हणाले या रस्त्याची फार दुरावस्था आहे. सामान्य नागरिकांसह वृद्ध व्यक्ती, महिला ,आजारी व्यक्ती यांना प्रवास करताना प्रचंड त्रास होतो .त्याशिवाय या मार्गावरून धावणाऱ्या एसटी गाड्याही कमी आहेत.अनेकदा ग्रामस्थांना गोव्यातील वाहनांचा आधार घ्यावा लागतो .गावातील युवक मोठ्या संख्येने नोकरी निमित्त गोव्याला जातात व रात्री अपरात्री रात्री परत येतात. मार्गामध्ये गवे ,बिबटे, रानडुक्कर यांचा वावर असतो. एखाद्या वेळी प्रसंग आल्यास त्यांना चुकवून पळणे सुद्धा या रस्त्यामुळे वाहन चालकांना अशक्य बनले आहे. त्यामुळे वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांवर ग्रामस्थांचा आता विश्वास राहिला नसुन शासनाने तात्काळ या रस्त्याचे काम न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी गुणाजी गवस, बाबूराव परब यांच्यासह माजी उपसरपंच नामदेव गवस, मुकुंद गवस, कुमार गवस, अमित गवस, एकनाथ गवस, निवृत्ती गवस, राजन गवस, सचिन गवस, राजू गवस, गोविंद परब, महादेव गवस आदी उपस्थित होते.