सर्वसामान्यांच्या पाठिंब्यामुळेच विजय
पोटनिवडणुकीतील विजयावर मंत्री हेब्बाळकर यांची प्रतिक्रिया
बेळगाव : कर्नाटकात राज्य सरकारने अमलात आणलेल्या गॅरंटी योजना म्हणजे केवळ घोषणा नाहीत. सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याला ते पाठबळ आहे. जनतेच्या वेदना, त्रास व त्यांच्या गरजा ओळखल्यामुळेच पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी झाला आहे, अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली. दावणगेरी दक्षिण व बागलकोटमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. याचाच अर्थ जनतेने लोकहिताचे प्रशासन स्वीकारले आहे, असा होतो. हा केवळ राजकीय विजय नाही. लोकविश्वासाचा विजय आहे. आमच्या गॅरंटी योजना घरोघरी पोहोचल्या आहेत.
महिला, युवक, गरीब, शेतकरी अशा प्रत्येक घटकाला त्या मदतीच्या ठरल्या आहेत. काँग्रेस सरकारने लोकहिताचा विचार केल्यामुळेच लोक काँग्रेसच्या बाजूने उभे आहेत. पोटनिवडणुकीतील विजय म्हणजे भाजपच्या विरोधात लोकांनी दिलेला संदेश आहे. खोटा प्रचार, लोकविरोधी धोरणांना लोकांनीच उत्तर दिले आहे. काँग्रेस सरकारला मिळालेले हे प्रमाणपत्र आहे. जनतेचा विश्वास आपले सरकार व पक्षावर असाच कायम राहील, यासाठी आम्ही तत्पर असणार आहोत, असेही हेब्बाळकर यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.