राष्ट्रीय महामार्गावर निष्पाप प्राण्यांचा बळी
रस्ता ओलांडताना अपघात : अवजड वाहने सुसाट, उपाययोजनांची गरज
पशुपालकात चिंता
राष्ट्रीय महामार्गावर वाहने सुसाट वेगाने धावतात. दरम्यान अवजड वाहनांची संख्या अधिक असते. दरम्यान रात्रीच्यावेळी रस्ता ओलांडताना अपघात घडू लागले आहेत. यामध्ये निष्पाप प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. विशेषत: गावाजवळून गेलेल्या महामार्गावर अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. काकती, होनगा, भुतरामहट्टी, हलगा, बस्तवाड, हिरेबागेवाडी आदी ठिकाणी अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
महामार्गावर प्राणी येणार नाहीत, यासाठी उपाययोजना राबवा
महामार्गावर गतवर्षी दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सातत्याने इतर भटकी जनावरे, कुत्री, माकड आणि इतर वन्यप्राण्यांचा बळी गेला आहे. हिवाळ्यात पहाटे धुके पडते. दरम्यान भरधाव वाहनांसमोर प्राणी येताच ठोकरुन जीव जाऊ लागला आहे. त्यामुळे महामार्गाशेजारी कायमस्वरुपी बॅरिकेड्स उभारावेत, अशी मागणीही होत आहे. गावाशेजारील महामार्गावर प्राणी येणार नाहीत, यासाठी योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही होत आहे.
रस्त्याशेजारी बॅरिकेड्स उभे करा
राष्ट्रीय महामार्गावर वाहने सुसाट येत असल्याने निष्पाप प्राण्यांचे बळी जाऊ लागले आहेत. गायी, म्हशी आणि भटकी जनावरे, कुत्री, माकड यासह वन्य प्राणीही मृत्युमुखी पडू लागले आहेत. रस्त्याशेजारी बॅरिकेड्स उभे करावेत जेणे करुन प्राणी रस्त्यावर येणार नाहीत. मागील वर्षभरात शेकडो प्राण्यांचा बळी गेला आहे.
- विनायक केसकर-हा माझा धर्म पशु बचाव दल-अध्यक्ष