मारहाणीनंतर केजरीवालांसोबत होता विभव
दिल्ली पोलिसांचा दावा : खासदार मालिवाल यांना मारहाण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाति मालिवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी 500 पानांचे आरोपपत्र दिल्ली उच्च न्यायालयात सादर केले होते. 7 ऑगस्ट रोजी या आरोपपत्रातील तपशील समोर आला. विभव कुमारने मालिवाल यांना 7-8 वेळा थप्पड लगावली होती. तर मारहाणीच्या घटनेनंतर विभव कुमार हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत होते असे आरोपपत्रात नमूद आहे.
आप नेते संजय सिंह आणि आतिशी यांनी प्रारंभी स्वाति मालिवाल यांच्यासोबत चुकीचा प्रकार घडल्याचे मान्य केले होते. परंतु नंतर त्यांनी स्वत:ची भूमिका बदलली होती. मुख्यमंत्री निवासस्थानात गुन्हा घडलेल्या ठिकाणच्या आसपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त करण्यापूर्वी काही फुटेज प्रसारमाध्यमांना पुरविण्यात आले होते. मुख्यमंत्री घटनास्थळी उपस्थित असणे, आप नेत्यांनी वक्तव्यं बदलणे आणि सीसीटीव्ही फुटेज लीक होणे हे सर्व मोठ्या गुन्ह्याचा संशय निर्माण करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
72 तासांमध्ये असे काय घडले, ज्यामुळे संजय सिंह आणि आतिशी यांनी स्वत:चे वक्तव्य बदलले याचा तपास आता दिल्ली पोलीस करणार आहेत. कोणत्या व्यक्तीसोबत चर्चा केल्यावर त्यांनी स्वत:चे वक्तव्य बदलले हे शोधून काढले जाणार आहे.
13 मे रोजी घडलेल्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संजय सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत विभव कुमारने स्वाति मालिवालांसोबत गैरवर्तन केल्याचे म्हणत याप्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. तर 17 मे रोजीच्या पत्रकार परिषदेत आतिशी यांनी मालिवाल यांचे आरोप फेटाळले होते. विभवने मुख्यमंत्री निवासस्थानात मालिवाल यांना मारहाण केली नसल्याचा दावा त्यांनी केला होता.
स्वाति रडत होत्या : रिक्षाचालक
घटनेनंतर मालिवाल एका रिक्षामधून स्वत:च्या घरी परतल्या होत्या. यामुळे संबंधित रिक्षाचालकाचीही चौकशी करण्यात आली आहे. मालिवाल या रडत होत्या आणि फोनवर कुणाला तरीही आपल्याला मारहाण झाल्याचे सांगत होत्या असा जबाब रिक्षाचालकाने दिला आहे. याचबरोबर मुख्यमंत्री निवासस्थानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. मालिवाल प्रवेशद्वारावरून पायी जात असताना रडत होत्या, त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडल्याचे वाटत होते असे या सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात आले.