सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी
अंतिम लढतीत मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटीलवर मात
प्रतिनिधी/कर्जत, अहिल्यानगर
मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्यात सोलापूरच्या वेताळ शेळके याने मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली आहे. वेताळने अंतिम सामन्यात मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा 7-1 असा पराभव करत महाराष्ट्र केसरी या गदेवर आपले नाव कोरले. दरम्यान, महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषद व आमदार रोहित पवार तुमच्या पुढाकारामधून अहिल्यानगर जिह्यातील कर्जत श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते मानाची महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा देण्यात आली. यावेळी, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, खासदार नामदेव मोहिते, खासदार निलेश लंके उपस्थित होते.
महाराष्ट्र कुस्ती परिषद व कुस्ती संघ यांच्या मधील वादामुळे यावेळीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच गाजली. फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर येथे झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत वादामुळे चांगलीच गाजली आणि कुस्ती परिषदेने दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचे ठरवले. आणि त्याची यजमानपद रोहित पवार यांनी स्वीकारले होते.
रविवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र केसरीची ही किताबी लढत सोलापूरचा वेताळ शेळके व मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाली. सुरुवातीच्या पहिल्या एक मिनिटांमध्येच पृथ्वीराजने एकेरी पट काढून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र वेताळ शेळकेने भक्कम बचाव केल्यामुळे त्याचा तो प्रयत्न फसला. यानंतर वेताळने गुडघ्यामध्ये बसून पृथ्वीराजचा पट काढायचा प्रयत्न फसला. यानंतर दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न पृथ्वीराजने केला पण तो यशस्वी झाला नाही. मात्र नकारात्मक कुस्ती केल्याबद्दल वेताळच्या विरोधात पृथ्वीराजला पहिला गुण पंचांनी दिला. कुस्ती सुरू होऊन तीन मिनिट झाले असताना पंचांनी कुस्ती सोडवली, त्यावेळी पृथ्वीराजचे दुर्लक्ष झाले आणि ती संधी साधत वेताळने थ्रो केला आणि पंचांनी त्याला दोन गुण दिले. मात्र त्यावेळी प्रशिक्षकांनी चार गुणांची मागणी करत निर्णयावर आक्षेप नोंदवला. यानंतर तिसऱ्या पंचाकडे निर्णय देऊन त्यांनी रिप्ले पाहून चार गुण वेताळ शेळके यास दिले. यानंतर पहिला हाफ संपण्याच्या वेळी पृथ्वीराजने चढाई केली मात्र पंचांनी वेळ संपण्याची शिट्टी वाजवली. यामुळे पृथ्वीराजला गुण दिले नाही. यावर त्यांनी तिसऱ्या पंचाकडे अपील केले मात्र ते अपील रिप्ले पाहून फेटाळण्यात आले. यानंतर गुण मिळवण्यासाठी पृथ्वीराजने अनेक वेळा प्रयत्न केला मात्र तितकाच भक्कम बचाव वेताळ शेळकेचा असल्यामुळे अखेर वेताळ शेळकेने बाजी मारत जेतेपद पटककावले.
शिवराज राक्षेला पराभवाचा धक्का
तत्पूर्वी झालेल्या गादी विभागातील उपांत्य फेरीमध्ये नांदेडचा शिवराज राक्षेचा मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटीलने पराभव केला. या कुस्तीमध्ये शिवराजच्या पायाला मार लागल्यामुळे तो जखमी झाला. दरम्यान, माती विभागामध्ये सोलापूरचा वेताळ शेळके आणि अकोला येथील प्रशांत जगताप यांच्यामध्ये झाली. यामध्ये वेताळने जगतापला पराभवाचा धक्का दिला.