वेंगुर्ले नगरपरिषदेला मिळाला सलग तिसऱ्या वर्षी प्रथम येण्याचा मान
“माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत कोकण विभागाचा निकाल
वेंगुर्ले । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत १५,हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावून रोख रुपये ७५ लाखांचे पारितोषिक मिळविले आहे. सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे वेंगुर्ला नगरपरिषदेला सलग तिसऱ्या वर्षी कोकण विभागात प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. हे यश केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून वेंगुर्ला शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. नगरपरिषद पुढील काळातही पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांना अधिक बळकटी देणार असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून शहर अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला आहे. माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत अधिक प्रभावी नियोजन करून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली असून भविष्यातही हा लोकसहभाग कायम राहील, असा विश्वास नगरपरिषदेमार्फत व्यक्त करण्यात आला.