भाज्या गगनाला, आंबा गडगडला!
पणजी : राज्यात बहुतेक आंब्याचे दर खाली उतरलेले आहेत, मात्र आता पुन्हा एकदा मानकुरादचे दर वाढू लागले आहेत. भाज्यांचे दर मात्र गगनाला भिडलेले आहेत. भाज्यांचे दर प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागल्यासारखे झाले आहे. टोमॅटोचा दर पन्नास ते साठ ऊपयांवर गेला आहे. कोथिंबीरचा दर एका जुडीला 50 ऊपये झाला आहे. घेवड्याचे दर प्रति किलो दोनशे ऊपयेपर्यंत पोहोचला आहे. भेंडी आता 80 ऊपयाला प्रति किलो झाली आहे. वांगे 60 ते 70 ऊपये प्रति किलो असून दोडकी ऊपये 60 ते 80 एवढी वाढली आहे.
दरवर्षी मे महिन्यात भाज्यांचे दर फार वाढलेले असतात. यंदा देखील अशाच पद्धतीने हे दर वाढलेले असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता काही भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे बेळगाव व आसपासच्या परिसरातून गोव्यात येणाऱ्या भाज्यांच्या दरात घाऊक विक्रेत्यांनी वाढ करून गोव्यात पाठविल्या आहेत. त्यामुळे गोव्यातील किरकोळ विक्रेत्यांनी देखील भाज्यांच्या दरात अवाच्या सव्वा वाढ केली आहे. शिवाय मे मध्ये भाज्यांचे उत्पादन घटलेले असते. त्यामुळे सध्या मिळत असलेल्या भाज्या या फार महागड्या असून सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर जात आहेत. भाज्यांचे दर बरेच वाढल्यानंतर आता हॉटेलमधील थाळीचे दर देखील वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
मानकुराद आला ज्यादा भाव
मानकुराद आंबा वगळता इतर सर्व आंब्याचे दर गडगडले आहेत. मानकुरादची आवक आता कमी झाली असून त्यामुळे मानकुराद प्रति डझन 600 ते 800 ऊपये पर्यंत गेला आहे. मात्र मांगीलाल व इतर आंबे आता बाजारात मोठ्या प्रमाणात आले असल्याने त्यांचे दर बरेच खाली उतरले आहेत. आंब्याचा खाली उतरलेला दर हा ग्राहकांसाठी दिलासा ठरतो, मात्र भाज्यांनी अनेकांचे कंबरडेच मोडले.