Pandhirichi Vari 2025: पाऊले चालती पंढरीची वाट, दिवे घाट पार करत पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना!
हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने उत्साहात अवघड दिवे घाट चढले
By : इम्तियाज मुजावर
सातारा : पंढरपूर वारीचा भक्तिरस ओतप्रोत भरलेला प्रवास सध्या महत्वपूर्ण टप्प्यावर आहे. आज सकाळी 10 वा माऊलींची पालखी दिवे घाटत पोहचली. हरी नामाचा जयघोष आणि संपूर्ण दिवे घाट दुमदुमला होता. पंढरीच्या दिशेने रवाना रवाना होत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने उत्साहात दिवे घाट चढत असताना दिसून आले. घाटामधील अवघड चढण भक्तीच्या ओढीने सुसह्य झाली!
‘ज्ञानोबा माऊली... तुकाराम’ या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात, हजारो भाविक वारकरी दिवे घाटात एकत्र जमले होते. पालखीच्या पुढे चालणाऱ्या 'देवा-बिट्ट्या' आणि 'राजा-हरण्या' या सजलेल्या बैलजोड्यांनी चांदीचा रथ ओढत घाट चढवताना अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
घाटाच्या वळणांवर भक्तांनी फुलांची उधळण केली. काही ठिकाणी पाय धुण्यासाठी पाण्याचे हंडे ठेवले गेले, आणि गावकऱ्यांनी फराळ-फळं वाटत सेवा केली. पालखी पाहून डोळ्यांत पाणी आणणारी श्रद्धा आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे दृश्य अंगावर काटा आणणारे ठरले.
पालखीने आता घाट पार केला असून, ती पुढे आळंदी-पंढरपूर महामार्गाने पंढरीच्या दिशेने निघाली आहे. वारकरी मंडळींमध्ये उत्साह शिगेला पोहोचला असून, “या वाटेवरती माऊली चालली…” हे प्रत्येकाच्या मनातलं गीत बनलं आहे.