‘वनराई’ जपते गोव्याची हिरवाई!
‘वनराई’ ट्रस्टचे रवींद्र धारिया गोव्यात : दै. तरुण भारत पणजी कार्यालयाला भेट
पणजी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ‘भगिरथ’ गोव्यातही पोहोचला आणि विविध ठिकाणी शेती, पाटबंधारे, वृक्षलागवड आदी योजनांमध्ये कोणताही गाजावाजा न करता राबू लागला आहे. ‘वनराई’ या संस्थेचे प्रख्यात समाजसेवक पद्मविभूषण स्व. डॉ. मोहन धारिया यांचे वनराईचे कार्य त्यांचे चिरंजीव रवींद्र धारिया हे सांभाळीत असून ते सध्या गोव्यात आलेले आहेत. आपल्या सामाजिक कार्याचा विस्तार ते करीत असून गोव्याची हिरवाई जपण्यासाठी त्यांनीही हातभार लावण्यास प्रारंभ केला आहे. रवींद्र धारिया हे बुधवारी दै. तरुण भारतच्या पणजी कार्यालयात पोहोचले. श्रात: समोर एक अखंडित विकासाचे उद्दीष्ट त्यांनी ठेवलेले आहे. जनतेमध्ये विशेषत: युवावर्गामध्ये पर्यावरण विषयक जागृती करणे हे मुख्य ध्येय समोर ठेवताना ‘आधी केले मग सांगितले’ या धर्तीवर त्यांनी अथक प्रयत्न महाराष्ट्र, गुजरात, दमण व दीव आणि गोव्यात सुरू केलेले आहेत.
कुडणे, न्हावेलीत काम सुरु
गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कुडणे, न्हावेली या भागात कार्य सुरू केले आहे. सत्तरीमध्येही त्यांनी अनेकांना कृषी उत्पादन वाढीसाठी व जलसंवर्धनासाठी सल्ले दिलेले आहेत. उत्तर गोव्यात कार्य वाढवितानाच त्यांनी दक्षिण गोव्यात सांगे येथे जाऊन सांगे तालुक्यात कृषी उत्पादन वाढीसाठी आपल्या अनुभवातून युवावर्गाला प्रेरणा देण्याचे ठरविले आहे.
मोहन धारियांची वनराई
स्व. मोहन धरिया हे विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी गोव्यात येऊन गोवा सरकारला जादा निधी मिळावा यासाठी केंद्राकडे काही शिफारशी केल्या होत्या. डॉ. धारिया यांना मानणारे अनेकजण आजही गोव्यात आहेत. त्यांनी पुण्यामध्ये 10 जुलै 1986मध्ये ‘वनराई’ या संस्थेची तथा ट्रस्टची स्थापना केली. या विश्वस्त मंडळाने आतापर्यंत देशात नैसर्गिक स्रोतांचा वापर करून साधन संपत्ती वाढविण्यावर भर दिला.
अडीच कोटी झाडे जिवंत
आतापर्यंत लावलेल्या झाडांपैकी अडीच कोटी झाडे आज जिवंत आहेत. गेल्या 37 वर्षांत या संस्थेने कर्नाटक, गुजरात व महाराष्ट्र या तीन मोठ्या राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलीय. शिवाय शेतीवाढीसाठी जे काही अथक प्रयत्न केले त्या प्रयत्नांही यश आले. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी शेतीपासून दूर जात होते. कारण पावसाचा अभाव, पाणी नाही. तसेच रासायनिक खतांच्या वापराने जमीन नापीक होत होती. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन जनावरे जगविणे कठीण जात होते. कृषी उत्पादनांना दर मिळत नव्हता. त्याचबरोबर समाजिकस्तर वाढविण्यासाठी शाळा स्थापन करणे, महिलांना उद्योजिका बनविणे, गावागावांमध्ये शौचालये उभारणे इत्यादी उपक्रम या ‘वनराई’ने हाती घेतले. अनेक बोडक्या डोंगरावर चर मारून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजना सुरू केली. त्यातून डोंगराच्या पायथ्याशी जलस्तर वाढला. तसेच डोंगरावर अनेक प्रकारची झाडेही जगली. त्यातून पावसाचे प्रमाणही वाढले, चारा मिळाला. जनावरांना जगण्यासाठी आवश्यक खुराक मिळाला. गावातून नद्या, ओहोळ वाहतात. उन्हाळ्यापूर्वी पाणी गायब. त्यातून माती वाचविणे, पाणी वाचविणे हे दोन्ही उपक्रम हाती घेतले. 2.60 कोटी झाडांचे वाटप केले. ज्यातून पर्यावरण जतन शक्य झाले. देशातील विविध राज्यात 1.58 लाख एकर जमीन शेती तथा लागवडीखाली आणली.
दीड लाख महिलांना ‘वनराई’ लाभ
सामूदायिक शेती योजनेतून क्रांती घडविली आणि त्यामुळे शेकऱ्यांना त्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळू लागला. दुभत्या जनावरांसाठी विविध योजना राबवून 10 हजार जनावरांना त्याचा लाभ मिळवून दिला. ग्रामीण भागात शाळा स्थापन करून शहरात आहे तशा सुविधा ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपलब्ध करून देऊन वनराईने ग्रामीण व शहरी भागातील शाळा या दरम्यान असलेली दरी बुजवून टाकण्याचा प्रयत्न केला. विविध ठिकाणी शौचालये उभारून वनराईने सुमारे 1 लाख 7 हजार नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला. महिलांना रोजगार संधी मिळवून देताना महिला उद्योजिका तयार केल्या. त्यांना प्रात्साहन दिले. 1.50 लाख महिलांनी ‘वनराई’ च्या योजनांचा लाभ घेतला.
गोव्यात अनेक उपक्रम राबविण्याचा इरादा!
रवींद्र धारिया यांनी सांगितले की, गोव्यात ‘वनराई’ तर्फे अनेक उपक्रम राबविण्याचा इरादा आहे. कृषी उत्पादन वाढावे त्याचबरोबर वनराई टिकवून ठेवावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अनेक कार्यकर्ते आता इथेही राबू लागले आहेत.