गोव्यातही आज एकमुखी गुंजणार ‘वंदे मातरम’!
150 वर्षे पूर्ण : राज्यभरात 150 ठिकाणी कार्यक्रम
पणजी : ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दि. 7 नोव्हेंबर रोजी या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी 9.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी अक्षय नवमीच्या शुभ दिनी ‘वंदे मातरम्‘ या गीताची रचना केली होती. त्याला यंदा 150 वर्षे पूर्ण होत आहेत. हे गीत सर्वप्रथम त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचा भाग म्हणून ‘बंगदर्शन’ या साहित्यिक नियतकालिकात प्रकाशित झाले होते.
मातृभूमीला सामर्थ्य, समृद्धी आणि देवत्वाचे प्रतीक मानणारे हे गीत भारताच्या जागृत होत असलेल्या एकता आणि आत्मसन्मानाच्या भावनेला काव्यात्मक अभिव्यक्ती देत होते. त्यामुळे हे गीत राष्ट्रासाठी भक्तीचे अखंड प्रतीक बनले. या गीताचे महत्व आजच्या युवा पिढीला समजावे या उद्देशाने देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याचाच भाग म्हणून गोव्यातही 150 ठिकाणी सकाळी 10 वाजता कार्यक्रम होणार आहेत. त्यात सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, निम सरकारी कार्यालये, आदी ठिकाणी गायले व वाजविले जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता भाजपच्या पणजी, मडगाव, म्हापसा येथील प्रदेश कार्यालयांच्या ठिकाणी प्रमुख कार्यक्रम होणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, अन्य मंत्री, पदाधिकारी सहभाग घेणार आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा
आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा पंचायत उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. उमेदवार जास्त असले तरीही निवड प्रक्रियेदरम्यान पक्ष त्यांना पटवून देणार असून त्यामुळे बंडखोरी होणार नाही, असे गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. राज्यात बिगरगोमंतकीयांना ‘घाटी’ संबोधण्यावरून निर्माण झालेल्या वादासंबंधी विचारले असता, अशाप्रकारे प्रादेशिकतेवरून लोकांमध्ये फूट घालण्याचे प्रयत्न निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले.