फोंड्यात ‘वंदे मातरम्’ भारतमातेचा जयघोष
राजीव गांधी कला मंदिरातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग ; नगरपालिकेनेही राबविला उपक्रम
फोंडा : वंदे मातरम् हे केवळ शब्द नसून स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचा तो एक महामंत्र होता. या राष्ट्रीय गीताला आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही त्या शब्दांना मानाचे स्थान असून भारतमातेच्या जयघोष असलेले राष्ट्रगीत सदोदीत देशवासियांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये काल शुक्रवारी आयोजित वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या 150 वर्षपूर्तीनिमित्त देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने संबोधन करीत असलेल्या कार्यक्रमात मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मामलेदार कौशिक देसाई, राजेश साखळकर, शुभम भरतू व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. सुमारे 7 विद्यालयातील विद्यार्थी व सरकारी अधिकारी यांनी सहभाग दर्शविला.
फोंडा येथील आल्मेदा हायस्कूल, शिक्षासदन विद्यालय प्रियोळ, महानंदू नाईक हायस्कूल भोम, महात्मा गांधी सेंटेनरी हायस्कूल गावणे, एमआयबीके हायस्कूल खांडेपार, दादा वैद्य हायस्कूल कुर्टी, आयव्हीबीडी हायस्कूल ढवळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना 7 नोव्हेंबर 1875 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम् हे गीत केवळ एक कविता नसून ते स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणास्थान ठरले. आनंद मठ या कादंबरीत प्रथम प्रकाशित झाल्याची माहिती देण्यात आली. या गीतामागील मागोवा विद्यार्थ्यांना व्हीडीओच्या माध्यमातून पटवून देण्यात आला. दरम्यान फोंडा पालिकेतर्फे वंदे मातरम् राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पालिकेसमोर सर्व कर्मचाऱ्यांनी वंदे मातरम् गीत सादर केले. यावेळी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक रितेश नाईक, रूपक देसाई व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.