आचरा येथील वडापावची टपरी आगीत जळून खाक
सर्व साहित्य जळाल्याने हजारोंचे नुकसान
आचरा प्रतिनिधी
देवगड - मालवण रस्त्यावर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अकस्मात लागलेल्या आगीत संपूर्ण टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून खाक झाले. यात हजारोंचे नुकसान झाले. घटनेची खबर मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आतील गॅस सिलिंडर बाहेर काढून टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.आचरा देवगड रस्त्यालगत पोयरे येथील सचिन राणे यांनी वडापाव टपरी उभारून आपला व्यवसाय सुरू केला होता. गुरूवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आचरा तिठा येथे रसवंती व्यावसायिकाचा उस उतरणारया गाडीवाल्याला लांबून आग लागल्याचे लक्षात येताच त्यांने याची ग्रामस्थांना माहिती देताच छोटू पांगे, तय्यब काझी, माणिक राणे, महेश मुळ्ये, बाबा वडापाव सेंटरचे बाबा आंबेरकर परिस्का हॉटेलचे कर्मचारी यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी टपरीच्या नजीक राहणाऱ्या निकिता बांदिवडेकर यांनी लागलीच आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. मात्र आगीची तीव्रता एवढी होती की संपूर्ण टपरी आतील सामानासह जळून गेली. प्रसंगावधन राखत ग्रामस्थांनी आतील गॅस सिलिंडर बाहेर काढून टाकल्याने दुर्घटना टळली.मात्र यात सचिन राणे यांच्या टपरीतील वडापाव साहित्य, पेटीतील पैसे, फ्रिज, पाण्याच्या बाॅटल, पाण्याची भांडी यांसह अन्य साहित्य जळून हजारोंचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.याबाबत माहिती मिळताच आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, सचिव पंकज आचरेकर, माजी उपाध्यक्ष जुबेर काझी यांनी भेट देऊन पाहणी केली होती. खबर मिळताच आचरा पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.