मृतदेहांच्या शोधासाठी लष्करी रडारचा वापर
वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या पोहोचली साडेतीनशे पार : अजूनही बरेच लोक बेपत्ता
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमधील वायनाडमध्ये 29-30 जुलैच्या रात्री मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 361 वर पोहोचली आहे. या सर्व मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. त्यापैकी 218 मृतदेहांची ओळख पटली आहे. 143 जणांच्या मृतदेहांचे काही अवशेष सापडल्यामुळे त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे. सध्या वायनाडमध्ये शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु अद्याप 206 लोक बेपत्ता आहेत. लष्कर, एनडीआरएफ, वन, पोलीस, निमलष्करी दल आणि स्वयंसेवकांसह 1,400 हून अधिक लोक त्यांच्या शोधात गुंतले आहेत. आता लष्करी डीप सर्च रडार यंत्रणेच्या सहाय्याने बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. वायनाडमध्ये नौदलाचे कर्मचारीही तैनात करण्यात आले असून ते राज्य सरकार आणि इतर पथकांसह पीडितांना मदत करत आहेत.
लष्कराने मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात बचावकार्य राबवण्याबरोबरच पूल व रस्त्यांची डागडुजी करून संपर्क साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. सध्या ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी ढिगाऱ्याखाली 20 ते 30 फूट मृतदेह दबले गेल्याची शक्मयता आहे. भूस्खलनग्रस्त भागात आता डीप सर्च रडार यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. हे रडार भूगर्भात 80 मीटर खोलीपर्यंत अडकलेल्या माणसांचा शोध घेते. बर्फाळ भागात, विशेषत: सियाचीन आणि लडाखमध्ये हिमस्खलनानंतर शोध घेण्यासाठी लष्कर या रडारचा वापर करते.
वायनाड भूस्खलनाच्या घटनेला आता पाच दिवस उलटले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ओळख पटलेल्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर 74 अनोळखी मृतदेहांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 707 कुटुंबातील 2 हजार 597 लोकांना मेपाडीच्या 17 मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. परिसरात 91 मदत केंद्रे उभारण्यात आली असून त्यामध्ये 10 हजारांहून अधिक लोक राहत आहेत. केरळमध्ये अजूनही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापैकी कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिह्यात यलो अलर्ट आहे.
4 मुलांसह आदिवासींची 4 दिवसांनंतर सुटका
वायनाड भूस्खलनाच्या पाचव्या दिवशी वन अधिकाऱ्यांनी 8 तासांच्या कारवाईत दुर्गम आदिवासी भागातून 4 मुलांसह 6 जणांची सुटका केली. वाचविण्यात आलेली मुले एक ते चार वर्षे वयोगटातील आहेत. पणिया समाजाचे हे आदिवासी कुटुंब डोंगरमाथ्यावरील गुहेत अडकले होते. वायनाडमध्ये भूस्खलनाच्या दिवशी शांता ही महिला तिच्या मुलासह जंगलात दिसली. तिची चौकशी केली असता सर्व कुटुंबीयच जंगलात अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर वन खात्याच्या मदतीने बचाव मोहीम राबविण्यात आली.