राज्यपालांनी मध्यस्थी करण्याचा आग्रह
10 पक्षांच्या नेत्यांची मणिपूरसंदर्भात राज्यपालांशी भेट, सौहार्दावर भर
वृत्तसंस्था / इंफाळ
मणिपूरच्या राज्यपाल अनुसूया उईके यांनी राज्यातील मैतेयी आणि कुकी या दोन समाजांच्या संघर्षामध्ये मध्यस्थी करावी, अशी मागणी 10 पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाने केली आहे. या पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेतली. राज्यात शांतता निर्माण होणे महत्वाचे असून राज्यपालांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह त्यांनी धरल्याचे राजभवनातून प्रसिद्ध वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले.
काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंग यांनी राज्यपालांना एक निवेदन सादर केले. केंद्र सरकारने मध्यस्थी केल्याशिवाय राज्यात शांतता पुनर्स्थापित होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुढाकार घेऊन दोन्ही समाजांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी त्वरित शांतता चर्चेचा प्रारंभ करावा. तसे केल्यास राज्यात स्थायी शांतता स्थापित होण्याची शक्यता आहे, असे या पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
कुकी नेत्याची धमकी
राज्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकी झू जमातींच्या एका संघटनेने राज्यात कुकी लोकांचे स्वयंनियंत्रित सरकार स्थापन करण्याची धमकी दिली होती. या जमातींची बहुसंख्या राज्याच्या ज्या भागात आहे, तेथे हे स्वतंत्र सरकार स्थापन केले जाईल. केंद्र सरकारने 48 तासांमध्ये मागण्या मान्य न केल्यास या स्वयंनियंत्रित प्रशासनाचा प्रारंभ करण्यात येईल, असे या धमकीत स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर या पक्षाच्या नेत्यांनी ही भेट घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. राज्यपालांनी त्यांचे म्हणणे केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्याचे या नेत्यांनी नंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारकडून निषेध
कुकी जमातींच्या संघटनेच्या या धमकीचा राज्य सरकारने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. अशा प्रकारची शासकीय व्यवस्था स्थापन करणे हे घटनेच्या आणि कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्य सरकार असे प्रयत्न हाणून पाडण्यास समर्थ आहे. ही धमकी देणाऱ्या कुकी नेत्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे कारवाईही सुरु केली होती.
विविध पक्षांचा समावेश
राज्यपालांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात विविध पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. आम आदमी पक्ष, एआयएफबी, एआयटीसी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, क्रांतीकारी समाजवादी पक्ष आणि एसएस (युबीटी) या पक्षांचे नेते शिष्टमंडळात होते.