शहरात वृक्षांची विनापरवाना कत्तल
वृक्षप्रेमी संतप्त : कारवाई करण्याची मागणी : पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : शहर आणि उपनगरात झाडांची विनापरवाना कत्तल वाढली आहे. त्यामुळे बेकायदेशीर झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींतून जोर धरून आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन काळाची गरज बनली आहे. मात्र दुसरीकडे झाडांची विनापरवाना कत्तल केली जात आहे. त्यामुळे शहरातील वृक्षांच्या संवर्धनाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी वनखाते शहर परिसरात रोपांची लागवड करते. मात्र विनाकारण झाडे तोडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच शहरातील वृक्षांच्या संख्येत घट होणार आहे. गणेशपूर व टिळकवाडी परिसरात विनाकारण मुळापासून झाडे तोडण्यात आली आहेत. विकासाच्या नावाखाली वृक्षांची तोडणी होऊ लागली आहे. तर काही ठिकाणी फांद्या छाटणीच्या नावाखाली बुंद्यापासूनच झाडे तोडली जात आहेत. एकीकडे रोप लागवडीसाठी शासन लाखो रुपये खर्ची घालत आहे. तर दुसरीकडे झाडांची कत्तल करून संख्या घटविली जात आहे.
बेकायदेशीर वृक्षतोड होऊ लागली आहे. वृक्षतोड करण्यासाठी वनखात्याची परवानगी आवश्यक आहे. मात्र काही जण विनापरवानाच रात्रीच्या अंधारात वृक्षतोड करू लागले आहेत. अशांवर कारवाई करावी, अशी मागणीही वृक्षप्रेमींनी केली आहे. अलीकडच्या काही वर्षांत वृक्षतोड कमी झाली होती. त्यामुळे शहर परिसरात वृक्षांची संख्या टिकून आहे. मात्र काही ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून वृक्षतोड केली जात असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाचा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. शहर परिसरात अडचण ठरत असलेली झाडे तोडायची असल्यास वनखात्याची परवानगी बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून राजरोसपणे वृक्षतोड सुरू आहे. वनखात्याने गांभीर्य घेऊन विनापरवाना वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे. शहर, उपनगरात घर व रस्त्याशेजारी अनेक धोकादायक वृक्ष आहेत. मात्र काही तरी कारण पुढे करून वृक्षतोड केली जात आहे. वनविभाग व मनपाच्या दुर्लक्षपणामुळे परस्पर झाडे तोडण्याचे प्रकार वाढले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात वारा आणि दमदार पावसामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होते. दरवर्षी पावसाळ्या दरम्यान वृक्ष तुटून पडतात. मात्र दुसरीकडे विनापरवाना वृक्षतोड केली जात आहे. परिणामी पर्यावरणाला धोका निर्माण होऊ लागला आहे.
वनखाते-मनपाच्या समन्वयातून धोकादायक झाडे हटवितात
झाडे किंवा एखादी झाडांची फांदी तोडायची असल्यास परवानगी घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना वृक्ष तोडल्याचे निदर्शनास आल्यास वनखात्याला माहिती द्यावी. बेकादेशीर झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. वनखाते आणि मनपाच्या समन्वयातून धोकादायक झाडे हटविली जातात.
पुरुषोत्तम रावजी (आरएफओ, बेळगाव)