विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकजूट दाखवा!
काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना ताकीद : पक्षातील अनेक गट पडद्यामागे सक्रिय
वार्ताहर/ बेंगळूर
लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासह काँग्रेस नेतृत्वाचा बचाव करण्यासाठी एकजूट दाखवा, अशी ताकीद काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना केली आहे. काँग्रेसमधील अनेक गट पडद्यामागे सक्रिय आहेत. त्यामुळे राजकीय मुद्द्यांचा विषय आल्यानंतर प्रत्येक गट वेगवेगळी भूमिका प्रदर्शित करतो. विरोधकांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका केल्यानंतर उर्वरित गटातील नेते आपल्याला त्याच्याशी काहीही देणेघेणे नसल्यासारखे गप्प बसतात.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर टीका होत असताना सिद्धरामय्या यांच्या गटातील नेते त्याला विरोध करत नाहीत. तसेच त्यावर कोणतेही भाष्य करत नाहीत. कधी कधी पक्षातील राष्ट्रीय नेत्यांवरही झालेल्या कठोर टीकेला विरोध करण्यासाठी काँग्रेसमध्ये राजकीय एकजूट नसते. त्यामुळे पडद्यामागील सक्रिय गटांची दरी वाढतच गेली आहे. लोकसभा निवडणुकीतही असेच सुरू राहिल्यास राजकीय फटका बसू शकतो, अशी भीती पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे एकजूट दाखविण्याच्या सूचना हायकमांडच्या नेत्यांनी दिल्या आहेत.
अलीकडेच खासदार अनंतकुमार हेगडे यांनी सिद्धरामय्या यांच्यावर एकेरी आणि अपमानास्पद टीका केली होती. यावर काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी मवाळ प्रतिक्रिया दिली आहे. केवळ मंत्री शिवराज तंगडगी यांनी कठोर शब्दात टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. प्रदीप ईश्वर यांना वगळता अन्य कोणत्याही आमदाराने सिद्धरामय्या यांच्या बाजूने आवाज उठविलेला नाही. त्यामुळे हायकमांडने थेट इशारा देत भाजपच्या टीकेला आणि आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसमधील भांडण बाजूला ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणुकीच्या काळातही लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने रचलेल्या खोटेपणाला तात्काळ उत्तर द्यावे. त्यामध्येही अपप्रचार होऊ देऊ नये, अशा सूचना हायकमांडने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.