For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गटारीतील पाण्यात बुडून बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

11:03 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
गटारीतील पाण्यात बुडून बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

रामतीर्थनगर येथील हृदयद्रावक घटना

Advertisement

बेळगाव : रस्त्याशेजारील गटारीत पडून एका बालिकेचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी कणबर्गी रोडवरील रेणुकानगर परिसरात ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अर्चना सुभाष राठोड ऊर्फ लमाणी (वय 8 वर्षे) असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. तिच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. अर्चनाचे कुटुंबीय मूळचे अरेबेंची तांड्यातील रहाणारे असून मोलमजुरीसाठी ते बेळगावला आले आहेत. नेहमीप्रमाणे तिचे वडील कामाला गेले होते. त्यावेळी आई व बहिणींसमवेत अर्चना आपण रहात असलेल्या रामतीर्थनगर येथील ठिकाणापासून जवळच असलेल्या रेणुकानगर परिसरात गेली होती. रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले आहे. पाणी जाण्यासाठी रस्त्याशेजारी खणलेल्या गटारीत साचलेल्या पाण्यात पडून अर्चनाचा बुडून मृत्यू झाला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या आईने तिला गटारीतून बाहेर काढले व वाचविण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, तेथे पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.