Solapur News : स्थानिक आमदारांनी मिळून शक्तीपीठ महामार्ग वाचवावा : प्रा. संग्राम चव्हाण
नवीन आरेखनामुळे शक्तिपीठ महामार्ग पुन्हा रखडण्याची शक्यता
सोलापूर : अलीकडेच सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे आरेखन बदलणार असल्याचे विधान केले आहे. शक्तिपीठ महामार्गाला सांगली व कोल्हापूर या दोनच जिल्ह्यामध्ये विरोध होत आहे. अस्तित्वात असलेल्या नागपूर-रत्नागिरी महामार्गाला सदरचा महामार्ग समांतर धावतो असा प्रमुख आक्षेप होता. हा महामार्ग सांगोला तालुक्यातील काही गावापासून जुन्या रत्नागिरी नागपूर महामार्गाला समांतर धावतो ही वस्तुस्थिती आहे.सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील विरोध लक्षात घेता सदरचा महामार्ग सांगोला परिसर किंवा पंढरपूर तालुक्यातील अनवली कासेगाव परिसरातून वळवून तो पुढे पिलीव-माण- खटाव- विटा- खानापूर- वाळवा-इस्लामपूर पन्हाळगड-आदमापूर- चंदगड असा नेता येऊ शकतो.
उत्तर सोलापूर, मोहोळ,पंढरपूर,सांगोला या चारही तालुक्यामधून जात असलेल्या शक्तिपीठ महामार्ग खालील जमिनींचे संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांच्या विनंती आवाहनाला मान देत या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध संपवून सहमती दर्शवली आहे होता. परंतु आरेखन बदलून या चार तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाल्यामुळे महामार्ग बाधित शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
सदर शक्तीपीठ महामार्गासाठी माढा तालुक्यातील पूर्वेकडील गावांमधून शेटफळ-करकंब- गुरसाळे हद्दीतून तो पुढे निरा नरसिंगपूर परिसरातून सांगली सातारा जिल्ह्यातील गावे घेत इस्लामपूर कडे वळविण्याचा घाट घातला गेला आहे. नवीन आरेखन स्वीकारल्यानंतर नवीन परिसरातून जाणारे शेतकरी या महामार्गाला विरोध करू शकतात त्यामुळे महामार्गाचे काम आणखी अनिश्चित काळासाठी रखडू शकते. कारण मुलंतः जमिनीचा मोबदला हा त्या त्या भागातील शेत जमिनीच्या रेडीरेकनरला असलेल्या दराच्या चारपट एवढाच मोबदला दिला जाणार असून तो पंधरा लाख रुपये प्रति एकर यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. सदरच्या तालुक्यामधील ड्रोन सर्वे, आरेखन,संयुक्त मोजणी वगैरेवर महाराष्ट्र राज्य शासनाचे सुमारे २५० कोटी रुपये आत्तापर्यंत खर्च झालेले असून सदरचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शेकडो कोटींच्या खर्चाला जबाबदार कोण? असा खडा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मान खटाव या मतदारसंघातील ३००० एकरात प्रस्थापित झालेल्या एमआयडीसी जवळून तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या नीरा नरसिंगपूर परिसरातून सदरचा शक्तिपीठ महामार्ग नेण्यासाठी महामार्गाचे पूर्वीचे आरेखन बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असे समजते. गेली तीन वर्षे झाली उत्तर सोलापूर,मोहोळ,पंढरपूर, सांगोला या चार तालुक्यातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांची शेती पडीक असून त्यामध्ये हा महामार्ग होणार की नाही या संभ्रमावस्थेमुळे तीन वर्षे शेतीतील उत्पन्न घेता आलेले नाही.
सदर बाधित क्षेत्रातील फळबागांकडे शेतकऱ्यांचे नकळत दुर्लक्ष झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड मानसिक आणि आर्थिक नुकसान झालेले आहे आणि आज महामार्गाचे आरक्षण बदलत असल्यामुळे बाधित शेतकरी प्रचंड नाराज झालेले आहेत. सदर नवीन आरेखनास या चारही तालुक्यातून प्रचंड विरोध होत असून शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची अभूतपूर्व एकजूट झालेली असून याबाबत सर्व शेतकरी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्या त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार राजन पाटील,आमदार प्रशांत परिचारक,आमदार समाधान अवताडे, माजी आमदार यशवंत माने,आमदार राजू खरे, उमेश पाटील यांनी एकत्रित प्रयत्न करून शक्तिपीठ महामार्ग या विकासगंगेचे स्थलांतर वाचवावे व आपापल्या मतदारसंघाचा विकास वाचवावा असे प्रतिपादन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.