यूएई, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत, पाकचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू असलेल्या यू-19 आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेत भारत व पाकिस्तान संघांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. भारतीय युवा संघाला बांगलादेश युवा संघाकडून 4 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला तर पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातने केवळ 11 चकित करीत अंतिम फेरी गाठली. रविवारी संयुक्त अरब अमिरात व बांगलादेश यांच्यात जेतेपदाची लढत होईल.
भारत-बांगलादेश सामन्यात सामनावीर मारुफ मृधाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव 42.4 षटकांत 188 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेश संघाने 42.5 षटकांत 6 बाद 189 धावा जमवित विजयासह अंतिम फेरी गाठली. भारताच्या डावात मुशीर खानने 61 चेंडूत 50, मुरुगन अभिषेकने 74 चेंडूत 62 धावा केल्या. याशिवाय सचिन धसने 16, राज लिंबानीने नाबाद 11 धावा केल्या. इतरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. अवांतराच्या रूपात मात्र 20 धावा मिळाल्या. बांगलादेशच्या मारुफ मृथाने 41 धावांत 4, रोहनत बोर्सन व शेख परवेझ शिबोन यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. बांगलादेशच्या डावात अरिफुल इस्लामने 90 चेंडूत 9 चौकार, 4 षटकारांसह 94, एहरार अमिनने 101 चेंडूत 41 धावा जमविल्या. भारताच्या नमन तिवारीने 3, लिंबानीने 2 बळी मिळविले.
यूएईचा पाकला धक्का
अन्य एका उपांत्य सामन्यात संयुक्त अरब अमिरातने बलाढ्या पाकिस्तानचा केवळ 11 धावांनी पराभव करीत प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यूएईचा डाव 47.5 षटकांत 193 धावांत आटोपला. त्यानंतर त्यांनी पाकचा डाव 49.3 षटकांत 182 धावांत गुंडाळत शानदार विजय साकार केला. यूएईच्या डावात सामनावीर ठरलेल्या कर्णधार आयान अफझल खानने सर्वाधिक 55, आर्यांश शर्माने 46, इथान डिसोझाने 37 धावा केल्या. पाकच्या उबेद खानने 44 धावांत 4, अली अस्फंद व अराफत मिन्हास यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. त्यानंतर पाकचा डाव अखेरच्या षटकात 182 धावांत गुंडाळला. कर्णधार साद बेगने 50, अझान अवैसने 41, अमिर हसनने 27 धावा केल्या. आयमन अहमद व हार्दिक पै यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.