मोर्लेत हत्तींकडून दोन महिलांचा पाठलाग
काजू बागायतीतून घरी परतताना घडली घटना ; भीतीने महिला बेशुद्ध
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा 6:30 वाजण्याच्या सुमारास काजू बागायतीतून मधून घरी परतत असताना अचानक हत्तींनी पाठलाग केल्याने या धावपळीच्या वेळी येथील एक महिला बेशुद्ध पडली तर एक महिला घाबरलेल्या अवस्थेत असून बेशुद्ध पडलेल्या पल्लवी प्रताप गवस (५०) यांना उपचारासाठी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
तिलारी खोऱ्यात हत्तींचा मुक्त संचार असून येथील नागरिकांना घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे. बऱ्याच लोकांनी आपल्या काजूबागेत हत्तीच्या भीतीने जाणे सोडले आहे. अशी भयावह स्थिती सध्या तिलारी खोऱ्यात निर्माण झाली आहे.शुक्रवारी मोर्ले येथील दोन महिला नात्याने जावा असलेल्या दोघींजणी आपल्या काजूबागेत गेल्या होत्या. तिथून उशिरा सायं 6:30 वा.दरम्यान काजू बागायतीतून मधून घरी परतत असताना अचानक हत्तींनी पाठलाग केल्याने त्यांनी जीव वाचविण्यासाठी धावाधाव केली यावेळी या धावपळीत अनेक ठिकाणी पडझड झाली.यात पल्लवी प्रताप गवस (५०)या खाली पडल्या हे पाहून त्यांच्यासोबत असलेल्या भाग्यश्री भगवान गवस (४५) यांनी घाबरून धावत घर गाठले व घरच्यांना याबाबत सांगितले त्यांनी लागलीच काजूबागेत धाव घेतली. येथे असणाऱ्या काही शेतकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीला मागे पिटाळले.मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस व सहकारी यांनी बेशुद्ध पडलेल्या महिलेला उपचारासाठी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर येथिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर भाग्यश्री गवस या अजूनही घाबरलेल्या अवस्थेत आहेत. तिलारी खोऱ्यातील मुक्तपणे संचार करीत असलेल्या रानटी हतींचा वनविभागाने बंदोबस्त करावा व हत्तींपासून मुक्तता मिळावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.उपचारांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने पल्लवी गवस यांना व प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी हुन 108 रुग्णवाहिकेतून आझिलो -गोवा येथे हलविण्यात आले.