गोकर्ण समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना वाचविले
कारवार : समुद्रलाटेच्या विळख्यात सापडून जीव वाचविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दोन पर्यटकांना वाचविण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी गोकर्ण येथील समुद्र किनाऱ्यावर घडली. संगमेश राजप्पा पाटील (वय 23, रा. वाडी जि. कलबुर्गी) आणि जयप्रकाश (वय 23, रा. बिदर) अशी वाचविण्यात आलेल्यांची नावे आहेत. घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी, बेंगळूर येथील एका खासगी कंपनीत सेवा बजावणारे दहा कर्मचारी पर्यटनासाठी गोकर्ण येथील मुख्य समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले. पोहण्यासाठी ते अरबी समुद्रात उतरले होते. त्यावेळी पाटील आणि जयप्रकाश हे पर्यटक समुद्र लाटेच्या विळख्यात सापडून गटांगळ्या खावू लागले. ही बाब समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या जग्गु हरीकंत्र, महेश हरीकंत्र, सचिन हरीकंत्र, कमलाकर होसकट्टी, महाबळेश्वर हरीकंत्र, गजानन नागेकर यांच्या लक्षात आली. त्यांनी दोन्ही पर्यटकांचे जीव वाचविले. अडचणीत सापडलेल्या पर्यटकांचे जीव वाचविण्याच्या मोहिमेत रोशन खारवी, शिवप्रसाद अंबीग, मोहन अंबीग, लोकेश हरीकंत्र, रवी नाईक, शेखर हरीकंत्र व गजेंद्र गौड सहभागी झाले होते. या प्रकरणाची नोंद गोकर्ण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.