शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा
‘पीएम किसान सन्मान’ योजनेचा 8 कोटी शेतकऱ्यांना लाभ : खात्यांमध्ये 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 15व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे. यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत सुमारे 18 हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.
झारखंडमधील खुंटी येथे आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटण दाबून हा हप्ता हस्तांतरित केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील सुमारे 28 लाख पीव्हीटीजींच्या सर्वांगीण विकासासाठी 24,000 कोटी रुपयांचे प्रधानमंत्री विशेष असुरक्षित आदिवासी गट मिशन सुरू केले आहे. आदिवासी प्रतिक बिरसा मुंडा यांची जयंती आणि तिसरा ‘जनजाती गौरव दिवस’ निमित्त मोदींनी झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील बिरसा कॉलेज मैदानातून मिशनची सुरुवात केली. या मोहिमेंतर्गत दुर्गम व आदिवासी भागात रस्ते आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी, वीज, सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छता, शिक्षणात सुधारित प्रवेश, आरोग्य आणि पोषण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी यासारख्या मूलभूत सुविधा प्रदान केल्या जातील.
मोदींनी पीएम किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता म्हणून 18,000 कोटी रुपयेही जारी केले. सरकार पशुधनाच्या मोफत लसीकरणावर 15,000 कोटी रुपये खर्च करत असल्याचे पंतप्रधानांनी कार्यक्रमप्रसंगी सांगितले. तसेच विश्वकर्मा योजनेवर 13,000 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. झारखंडमध्ये आता 100 टक्के विद्युतीकृत रेल्वेमार्ग असून राज्यात सुमारे 7,200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या नऊ वर्षांत देशभरात 300 हून अधिक विद्यापीठे आणि 5,500 नवीन महाविद्यालये स्थापन झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली. रांची येथील आयआयएम पॅम्पस आणि आयआयटी-आयएसएम, धनबाद येथील नवीन वसतिगृहांच्या उद्घाटनाचाही मोदींनी उल्लेख केला.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून मदत दिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारद्वारे चालवली जाणारी योजना असून देशातील सर्व शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकरी कुटुंबाला तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवषी 6,000 रुपये दिले जातात.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेद्वारे प्रत्येक शेतकरी कुटुंबाला तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवषी 6,000 रुपये मिळतात. पहिला हप्ता एप्रिल महिन्यात, दुसरा हप्ता जुलै महिन्यात आणि तिसरा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला जातो.