दोन दहशतवाद्यांचा उधमपूरमध्ये खात्मा
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. लष्कराच्या फर्स्ट पॅरा सैनिकांना बुधवारी सकाळी गुप्तचर विभागाकडून उधमपूरच्या खांद्रा टॉपच्या जंगलात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात आली. दुपारी 12.50 वाजता दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. सुमारे चार तास चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.
काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दहशतवाद्यांचे कारनामे वाढले आहेत. निवडणुकीत व्यत्यय आणण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून कुरापती सुरू असल्या तरी त्यांना रोखठोक प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांकडून सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काश्मीरमध्ये सध्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे.