पीर्ण येथील खून प्रकरणात आणखी दोघे गजाआड
संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी
पणजी : पीर्ण येथे झालेल्या कपिल चौधरी (19 वर्षे, उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणात आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून सर्वजण पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये रविश्वर नाईक (आराडी, गिरी-बार्देश) आणि विठ्ठल तुयेकर (अॅनावाडा कांदोळी) यांचा सहभाग आहे.
खुनाची घटना उघडकीस येताच अवघ्या 15 तासात गुरुदत्त सुभाष लवंदे या मुख्य संशयिताला अटक करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी डायसन आग्नेलो कुतिन्हो व सुरज ज्योतीशी ठाकूर या संशयितांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे की, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता मयत कपिल चौधरी याने गौरावाडा कलंगुट येथील डोना क्रिस्टिलीना नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये चेक-इन केले होते. त्याने दीपक अजित ठाकूर या नावाने बनावट ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत दिली होती. त्या ओळखपत्रावर स्वत:चा फोटो लावण्यात आला होता.
त्याने रोझ अँड सेबी कार रेंटल्सकडून नोंदणी क्रमांक जीए-03-व्ही-7845 असलेली काळ्या रंगाची थार कार दोन दिवसांसाठी भाड्याने घेतली. भाड्याने घेण्यासाठी प्रतिदिन रु. 3500/- आणि ठेव रु. 5,000/- इतकी रक्कम दिली. (कार रेंटल एजन्सी आणि गेस्ट हाऊस एकाच मालकाची आहे). त्यानंतर, दोन बॅगा कारमध्ये घेऊन गेस्ट हाऊसमधून बाहेर पडत होता. तो दोन्ही बॅगा घेऊन जात असताना रिसेप्शनिस्टला दिसले, तेव्हा त्याला संशयास्पद वाटले आणि त्याने त्याला जाण्यापासून रोखले. त्याने त्याच्या कार भाड्याने देणाऱ्या मालकाला कळवले आणि त्यांनी त्याच्याकडून कार परत घेतली.
पुढे त्याने गुऊदत लवंदेकडून त्याच भाड्याच्या किमतीत दुसरी काळ्या रंगाची कार भाड्याने घेतली. दुसरी कार भाड्याने घेताना त्याने दीपक ठाकूरच्या नावाने तेच बनावट ड्रायव्हिंग लायसन देखील दिले होते. तो दुसऱ्या भाड्याने घेतलेल्या कारसह गेस्ट हाऊसमधून एका काळ्या रंगाच्या हँड बॅगसह निघून गेला, त्याची लाल रंगाची ट्रॉली बॅग मागे ठेवली. थोडक्यात, मयत कपिलने स्वत:ला ग्राहक म्हणून कारमलकाला बनावट ओळखपत्रे तयार करून सर्व रोख व्यवहार केले आणि नंतर कार घेऊन गोवा राज्य सोडले. त्याच दिवशी संशयित गुऊदत लवंदे याला सदर कार गोवा सीमा ओलांडून महाराष्ट्राच्या दिशेने जात असल्याचे ट्रॅकरद्वारे (जीपीएस) आढळून आले होते आणि कणकवली येथे त्याला पकडण्यात यश आले होते.