उत्तराखंडमधील हिंसाचारात दोघांचा बळी
बेकायदेशीर मदरसा पाडल्याने दंगल, 250 जखमी
वृत्तसंस्था / डेहराडून
उत्तराखंडमधील हलद्वानी येथे प्रशासनाने एक बेकायदेशीर मदरसा आणि त्याला लागून असलेली मशीद पाडविल्यानंतर उसळलेल्या धार्मिक दंगलीत 2 जणांचा बळी गेला आहे. तसेच 250 हून अधिक जखमी झाले आहेत. प्रशासनाने दंगलखोरांवर दिसताक्षणीच गोळी घालण्याचा आदेश दिला असून संचारबंदीही लागू केली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हलद्वानी शहरात सरकारच्या तीन एकर भूमीवर अतिक्रमण करून काही समाजकंटकांनी तेथे बेकायदेशीररित्या मदरसा उभारला होता. तसेच त्याला लागून मशीदीचे बांधकामही केले होते. प्रशासनाने या मदरशाच्या आणि मशिदीच्या व्यवस्थापनाला नोटीस देऊन ही भूमी रिकामी करण्याचा आदेश दिला होता. तथापि, आदेश देऊन काही महिन्यांनंतरही ही बेकायदेशीर बांधकामे हटविण्यात आली नाहीत. त्यामुळे ती पाडविण्याची तयारी प्रशासनाने केली. प्रत्यक्ष कारवाईच्या आधी 24 तास नियमाप्रमाणे आणखी एक नोटीस देण्यात आली होती. मात्र, या नोटीसीकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
बांधकामे पाडविली
शुक्रवारी सकाळी प्रशासनाने बुलडोझर पाठवून ही बेकायदा बांधकामे पाडविली. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला. जमावाने प्रशासनाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर जोरदार दगडफेक करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे संरक्षणासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले. साधारणत: 100 पोलिसांच्या संरक्षणात बेकायदा बांधकामे नष्ट करण्यात आली. मात्र, त्यानंतरही दगडफेक होतच राहिली. संरक्षणासाठी स्थानिक सशस्त्र दलाच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले होते.
50 पोलीस जखमी
काही काळानंतर जमाव आणखी मोठा झाला आणि सार्वजनिक मालमत्तेला आगी लावण्याचे प्रकार घडले. तसेच खासगी वाहने आणि घरांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण भागात त्वरित संचारबंदी लागू करण्यात आली आणि दंगलखोरांवर दिसताक्षणीच गोळीबार करण्याचा आदेशही देण्यात आला.
पोलीसस्थानक पेटविण्याचा प्रयत्न
हिंसक जमावाने नंतर नजीकच्या पोलीस स्थानकावर हल्ला केला. पेट्रोल ओतून स्थानक जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमावाने बॅरिकेडस् तोडून स्थानकात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी बऱ्याच संयमाने परिस्थिती हाताळली. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूरही सोडण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानेच पाडवापाडवी
बेकायदेशी बांधकामे न्यायालयाच्या आदेशानुसारच पाडविण्यात आली होती, असे नैनिताल जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंग यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांवर समाजविरोधी लोकांकडून हल्ला करण्यात आला. मात्र, पोलिसांनी कोणताही अतिरेक न करता परिस्थिती हाताळली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पत्रकारांवरही हल्ले
या घटनेचे वृत्तांकन आणि व्हिडीओ चित्रण करणाऱ्या अनेक पत्रकारांवरही हिंसक जमावाने हल्ला केला. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत काही पत्रकार जखमी झाले असून त्यांच्या साधनसामग्रीची मोडतोड झाली आहे. आता या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
योजनाबद्ध हिंसाचार
जमावाकडून भावनेच्या भरात हिंसाचार झाला नसून तो अत्यंत योजनाबद्ध रितीने घडविण्यात आला आहे, असे प्रतिपादन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. दंगलीची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून दंगलखोरांना आणि हत्या करणाऱ्यांना अटक करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दंगलीच्या सूत्रधारांनाही लवकरच शोधण्यात येईल, असे प्रतिपादन पोलिसांनी केले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सर्वांना शांततेचे आवाहन पेले आहे. दंगलप्रभावित भागात इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे.