For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगड नक्षली हल्ल्यात दोन जवानांना वीरमरण

06:29 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगड नक्षली हल्ल्यात दोन जवानांना वीरमरण
Advertisement

नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाने सुरक्षा दलाचा ट्रक उडवला

Advertisement

वृत्तसंस्था/ सुकमा, विजापूर

छत्तीसगडच्या सुकमा आणि विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांनी रविवारी मोठा घातपात घडवला. सिल्गर आणि टेकलगुडम दरम्यान नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ट्रकला आयईडी स्फोटाने उडवले. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा बटालियनचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत.

Advertisement

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. याचदरम्यान जवानांच्या कारवाईने हादरलेल्या नक्षलवाद्यांनीही सुरक्षा दलाविरोधात मोहीम सुरू केली आहे. सुकमा आणि विजापूरच्या सीमेवर असलेल्या सिल्गर आणि टेकलगुडमजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन कोब्रा सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. नक्षलवाद्यांनी जवानांच्या ट्रकवर आयईडीचा स्फोट केला आहे. शक्तिशाली आयईडी स्फोटामुळे सुरक्षा दलाचे वाहन उलटले असून घटनास्थळावरून जवानांचे पार्थिव बाहेर काढण्यात आल्याचे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले. हुतात्मा जवानांची नावे विष्णू आर आणि शैलेंद्र अशी असल्याचेही त्यांनी सांगितले. शैलेंद्र (29) हे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून चालक विष्णू आर (35) हे मूळचे केरळचे आहेत. दुर्घटनाग्रस्त ट्रकमधून सीआरपीएफ जवानांसाठीच्या राशन आणि अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात होती. चालक आणि अन्य एका सैनिकाव्यतिरिक्त अन्य कोणीही सैनिक सदर ट्रकमधून प्रवास करत नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

राज्याची राजधानी रायपूरपासून 400 किमी अंतरावर सुरक्षा दलांच्या सिल्गर आणि टेकलगुडेम पॅम्प दरम्यान तिम्मापुरम गावाजवळ दुपारी 3 वाजता नक्षलवादी स्फोट झाला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. नक्षलवादी हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. आता परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

नक्षलवाद मोडून काढणार : मुख्यमंत्री

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना ‘जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’ असे म्हटले आहे. बस्तर भागात सुरू असलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईमुळे नक्षलवादी हताश झाले असून निराशेतून ते अशी भ्याड कृत्ये करत आहेत. मात्र, नक्षलवाद संपेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.