काणकोणात दोन मुलांचा बुडून मृत्यू
वझरे-अर्धफोंड येथील नदीत उतरल्यावेळी घडलेली दुर्दैवी घटना
. भा. प्रतिनिधी
काणकोण : वाढता उष्मा घालविण्यासाठी पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा वझरे, अर्धफोंड येथील नदीत बुडून मृत्यू येण्याची दुर्घटना 25 रोजी दुपारी घडली. या नदीवर एकूण तीन मुले गेली होती. त्यातील ध्रुव उदय वडार (4 वर्षे) आणि ऋग्वेद धनंजय नाईक (10 वर्षे) हे खेळत असतानाच पाण्यात पोहायला उतरले. पाण्याचा ठाव न समजल्यामुळे ते पोहताना पाण्यात बुडाले.
ध्रुव वडार हा धुप्यामळ, नवावाडा असून भाटपाल येथील केजीमध्ये शिकत होता. दुसरा मुलगा ऋग्वेद नाईक हा कारवारचा असून तो आपल्या मावशीकडे सुट्टी घालविण्यासाठी आला होता. त्यांच्याबरोबर असलेल्या तिसऱ्या मुलाने धावत जाऊन या घटनेची माहिती, दिल्यानंतर वाड्यावरील लोकांनी वझरे येथे धाव घेतली आणि सर्वत्र शोधाशोध केली. परंतु दोघांचाही पत्ता लागला नाही. लगेच काणकोणच्या पोलिस आणि अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून शवचिकित्सेसाठी मडगावला पाठविले.
या दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे धुप्यामळ, नवावाडा येथे शोककळा पसरली आहे. आपल्या नातेवाईकांकडे सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी ऋग्वेद आला होता. जाताना आपल्या सवंगड्याला बरोबर घेऊन गेला, अशी प्रतिक्रिया वाड्यावरील हळहळणारे लोक व्यक्त करताना दिसले. काणकोणचे पोलिस पुढील तपास करत आहेत.