Tukaram Mundhe | 'एका दिवसासाठी मुख्यमंत्री झालो तर...' तुकाराम मुंढेंचं स्पष्ट उत्तर!
मुंबई - राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि निकृष्ट दर्जाच्या दूधविक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक कारवायांमुळे राज्यभरातील अन्न माफियांमध्ये खळबळ उडाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी त्यांना, "जर तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आणि अमर्याद अधिकार मिळाले, तर तुम्ही काय कराल?" असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुंढे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत कोणालाही अमर्याद अधिकार नसतात आणि तसे असूही नयेत. आपण एक शासकीय अधिकारी म्हणून समाजाच्या विकासासाठी काम करणे, लोकांना सक्षम बनवणे आणि प्रशासन अधिक परिणामकारक करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कोणतीही जबाबदारी मिळाली तरी ती पूर्ण पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्यावर माझा विश्वास आहे. मला दिलेले उद्दिष्ट आणि भूमिका यशस्वीपणे पूर्ण व्हावी, यासाठी मी प्रत्येक दिवस अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो. मी एक शासकीय सेवक असून माझ्या अधिकारांच्या आणि मर्यादांच्या चौकटीत राहूनच काम करतो. लोक मला 'नायक' म्हणत असतील तर तो त्यांचा माझ्यावरील विश्वास आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागात वाढलेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती. सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार त्यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारला असून त्यानंतर राज्यभर धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.