स्वच्छ अभियानात शहराच्या निवडीसाठी प्रयत्न करा
15 दिवसांत आराखडा तयार करून पाठविण्याची सूचना
बेळगाव : शहरामध्ये स्वच्छ अभियानअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयामध्ये व्यवस्थापकीय संचालक आफरीनबानू बळ्ळारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीमध्ये स्वच्छ शौचालय अभियान, बायोगॅस प्लॅन्ट, सीएनजी प्लॅन्ट, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. याबाबत आराखडा तयार करून केंद्र सरकारला पाठवून देण्यात येणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत हे सर्व आराखडे पाठवून दिले जाणार आहेत. देशातील एकूण 18 महापालिकांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये बेळगावची निवड व्हावी यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. सीएनजी प्लॅन्ट उभा करून त्यामधून निर्मिती करण्यात आलेले सीएनजी गॅस वाहनांना दिले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या करामध्ये वाढ होणार आहे. त्यादृष्टिने प्रयत्न केले जाणार आहेत. प्लास्टिकचा वापर करून डांबरी रस्ताही करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेच्या समोर असलेला 200 मीटरचा रस्ता केला जाणार आहे. त्याचा आराखडाही तयार करून केंद्रीय स्वच्छ अभियानाला पाठवून देण्यात येणार आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आफरीनबानू बळ्ळारी यांनी अधिकाऱ्यांनी योग्यरितीने संपूर्ण अहवाल तयार करावा, अहवाल जानेवारी अखेरपर्यंत देणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टिने काम करावे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला स्मार्ट सिटीचे अधिकारी, तसेच महानगरपालिकेतील पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.