ट्रम्प यांचा निर्णय, बांगलादेशात उपासमारीचा धोका
सुमारे 10 लाख रोहिंग्या शरणार्थी होणार प्रभावित
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात रोहिंग्या शरणार्थींना अन्नधान्यात कपातीला सामोरे जावे लागत आहे. कारण सहाय्यक संस्थांनी निधीत कपात केली आहे. कॉक्स बाजार या बांगलादेशातील सर्वात मोठ्या शरणार्थी शिबिरात राहणाऱ्या रोहिंग्यांना यामुळे समस्येला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेने या शरणार्थींकरता दिला जाणारा निधी रोखला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे 10 लाखाहून अधिक रोहिंग्या शरणार्थींच्या पोषणावर प्रभाव पडणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी बहुतांश विदेशी सहाय्य रोखले आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय विकासासाटी काम करणारी अमेरिकेची संस्था युएसएडवर कारवाई केली आहे. यामुळे जगभरात मानवीय मदतीसाठी राबविण्यात येणाऱ्या अभियानांवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. तर या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या विश्व अन्न कार्यक्रमाने 1 एप्रिलपासून कॉक्स बाजारमध्ये अन्नधान्य पुरवठ्यात कपात सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.
ऑगस्ट 2017 मध्ये म्यानमारमध्ये हिंसा सुरू झाल्यावर 7 लाखाहून अधिक रोहिंग्यांनी बांगलादेशात धाव घेतली होती. बौद्धबहुल म्यानमार या देशात रोहिंग्यांना हिंसेला सामोरे जावे लागले होते. जागतिक अन्न कार्यक्रमाचा निर्णय थेट ट्रम्प प्रशासनाच्या कारवाईशी संबंधित आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पूर्वी अन्नधान्यासाठी मिळणारी मदत दर महिन्याला प्रत्येक शरणार्थीसाठी 12.50 डॉलर्स इतकी होती. परंतु आता हे प्रमाण कमी करत 6 डॉलर्स करण्यात आल्याची माहिती बांगलादेशचे शरणार्थी विषयक आयुक्त शमसूद दौजा यांनी दिली आहे.
अनेक प्रकल्प प्रभावित होणार
युएसएडची मदत थांबल्याने बांगलादेशातील अन्य प्रकल्प स्थगित हाणार आहेत, परंतु रोहिंग्या शरणार्थीसाठी सहाय्यनिधी दिला जात राहणार असल्याचा दावा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केला आहे. बांगलादेशात वास्तव्य करत असलेल्या रोहिंग्या शरणार्थींसाठी सर्वात मोठी मदत अमेरिकेकडूनच प्राप्त होते. शरणाथींसाठी मिळणाऱ्या मदतनिधीचा जवळपास निम्मा हिस्सा अमेरिकेकडून प्राप्त होतो. 2024 मध्ये अमेरिकेने 300 दशलक्ष डॉलर्सचा मदतनिधी दिला होता.
2024 मध्ये 70 हजार शरणार्थी दाखल
बांगलादेशात मागील वर्षी सुमारे 70 हजार शरणार्थी म्यानमारची सीमा ओलांडून पोहोचले होते. म्यानमारमधील बंडखोरांच्या सैन्याने रखाइन प्रांतावर कब्जा केला आहे. यामुळे तेथील रोहिंग्या विस्थापित होत बांगलादेशात पोहोचले आहेत. तर रोहिंग्या शरणार्थींना म्यानमारमध्ये परतावे लागणार असल्याचे बांगलादेशने म्हटले आहे.