For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तृणमूल बंडखोर गट त्रिपुराच्या ‘एनसीपी’मध्ये विलीन होणार

02:14 AM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
तृणमूल बंडखोर गट त्रिपुराच्या ‘एनसीपी’मध्ये विलीन होणार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी  दिल्ली

Advertisement

तृणमूल काँग्रेसमध्ये मोठे बंड झाले आहे. हा अंतर्गत संघर्ष आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. बंडखोर टीएमसी खासदारांनी एक मोठा निर्णय घेत त्रिपुराच्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये (एनसीपी) विलीन होण्याची घोषणा केली आहे. पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठी बंडखोर खासदारांनी हे पाऊल उचलले आहे. आपल्या खासदारकीच्या जागा वाचवण्यासाठी ही एक रणनीती आहे. या मोठ्या राजकीय धक्क्यामुळे दिल्ली ते कोलकातापर्यंतचे राजकारण तापले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटातील काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंदोपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्यासह अन्य खासदारांनी रविवारी सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या बंडखोर खासदारांनी लोकसभेत स्वत:साठी स्वतंत्र आसनव्यवस्थेची औपचारिक मागणी केली आहे. 28 टीएमसी खासदारांपैकी 20 ते 22 खासदार त्यांच्यासोबत आहेत, असा बंडखोर गटाचा दावा आहे. आपल्या गटाला संसदेतील खरा टीएमसी विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केले आहे. अध्यक्षांना भेटण्यापूर्वी, या बंडखोर खासदारांनी भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक प्रदीर्घ रणनीती बैठक घेतली. या बैठकीला सयोनी घोष आणि माला रॉय यादेखील उपस्थित होत्या.

Advertisement

नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीनीकरण का?

नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी हा प्रामुख्याने त्रिपुरास्थित एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. त्याचा राजकीय आधार ईशान्येकडील राज्यांमध्ये, विशेषत: त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये मानला जातो. हा एक मोठा किंवा राष्ट्रीय स्तरावरचा मुख्य पक्ष नसून, एक लहान आणि कमी प्रसिद्ध असलेला पक्ष आहे. बंडखोर टीएमसी खासदारांनी पक्षांतरबंदी कायद्यातील कायदेशीर अडथळे दूर करण्यासाठी या पक्षाची काळजीपूर्वक निवड केली आहे. संसदीय नियमांनुसार सभागृहात स्वतंत्र गटाला थेट मान्यता देण्यास मनाई आहे. असे केल्यास सदस्यत्व गमावण्याचा धोका असल्यामुळे आपले सदस्यत्व टिकवून ठेवण्यासाठी मूळ पक्षात विलीन होणे कायदेशीररित्या अनिवार्य होते. या विलीनीकरणानंतर बंडखोर गट एका नवीन तांत्रिक आणि कायदेशीर चौकटीअंतर्गत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला आपला पाठिंबा देईल.

ममता बॅनर्जी गटाच्याही हालचाली गतिमान

बंडखोरीची बातमी पसरताच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील मूळ टीएमसीनेही आपली कायदेशीर कारवाई तीव्र केली. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले. कीर्ती आझाद आणि सागरिका घोष यांनी स्वत: अध्यक्षांना हे पत्र पोहोचवले.

Advertisement
Tags :

.