परिवहन कर्मचाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम
2 मार्चपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्याची मुदत
बेंगळूर : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप पुकारत बेंगळूरमधील फ्रीडम पार्कवर आंदोलन छेडले. त्यामुळे प्रवासी वाहतूक कोलमडली. अखेर राज्य सरकारने परिवहन संयुक्त कृती समितीची बैठक घेत आश्वासनांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी सरकारला 2 मार्चपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. जर मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आल्याने शुक्रवारपासून परिवहनची बससेवा नेहमीप्रमाणे सुरळीत होईल.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीने ‘बेंगळूर चलो’ची हाक दिली होती. सरकारने गुरुवारी सायंकाळपर्यंत आमच्या मागण्यांना प्रतिसाद दिला नाही तर बससेवा बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सरकारने बुधवारी रात्रीच आदेशपत्रक जारी करत 26 महिन्यांच्या वेतनातील फरक आणि सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास संमती दर्शविली होती. मात्र, पूर्वनियोजनाप्रमाणे परिवहन कर्मचाऱ्यांनी गुरुवारी बेंगळुरातील फ्रीडम पार्क येथे धरणे आंदोलन केले.