खासगी भाजी मार्केटमधील व्यवसाय एपीएमसीमध्ये स्थलांतरित करा
घाऊक भाजीपाला व्यापारी कल्याण विकास संघाची मागणी
बेळगाव : जय किसान या खासगी भाजी मार्केटमुळे एपीएमसी मार्केटमध्ये बाजार पूर्णपणे थांबला आहे. मागील 32 महिन्यांपासून व्यवसाय थांबल्याने याचा परिणाम व्यापाऱ्यांसोबत हमाल तसेच वाहतूक कामगारांवर झाला आहे. त्यामुळे जय किसान भाजी मार्केट बंद करून तेथील व्यापार एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भरवावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा घाऊक भाजीपाला व्यापारी कल्याण विकास संघाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.बेळगाव शहर एपीएमसी भाजी मार्केट असतानाही जय किसान हे खासगी भाजी मार्केट सुरू करण्यात आले. दोन ठिकाणी भाजी मार्केट झाल्यामुळे याचा फटका व्यापाराला बसला. एपीएमसी भाजी मार्केट येथील भाजीचे लिलाव थंडावले गेले.
व्यापाऱ्यांनी जमिनी विकून एपीएमसीमध्ये दुकान गाळे खरेदी केले होते. या सर्व व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आधीच कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली असताना त्यानंतर खासगी भाजी मार्केटमुळे व्यापार पूर्णपणे ठप्प होत आहे. यामुळे बँकांचे हप्ते कसे भरायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या खासगी भाजी मार्केटचे सर्व भाजीचे व्यवहार पुन्हा एपीएमसीमध्ये सुरू करावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने निवेदन स्वीकारण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकरवी निवेदन बांधकाम मंत्री, कृषी विभाग, मुख्य सचिव, सहकार विभागाला पाठविण्यात आले.