For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तानाजी गल्ली-भांदूर गल्लीतील व्यापारी डबघाईला

12:24 PM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
तानाजी गल्ली भांदूर गल्लीतील व्यापारी डबघाईला
Advertisement

वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने व्यापार थंडावला : काहींनी दुकाने काढली विक्रीस

Advertisement

बेळगाव : तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट 10 मार्चपासून नैर्त्रुत्य रेल्वेने कायमस्वरुपी बंद केले आहे. त्यानंतर आता या ठिकाणी काँक्रिटची भिंत बांधली जात असल्याने तानाजी गल्ली व फुलबाग गल्ली यांचा संपर्क पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा परिणाम येथील व्यापाऱ्यांनी आपले दुकानगाळे विक्री तसेच रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेगेट बंद झाल्याने व्यापार ठप्प झाला असून दुकान बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे उत्तर व्यापारी देत आहेत. कपिलेश्वर उड्डाणपुलापाठोपाठ तानाजी गल्ली येथे रेल्वेगेट होणार होते. सततची वाहतूक कोंडी तसेच येथील रेल्वेगेट नैर्त्रुत्य रेल्वेसाठी डोकेदुखीचे ठरत असल्याने उड्डाणपुलाचा आराखडा तयार करण्यात आला. परंतु, स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे उड्डाणपुलाचा प्रस्ताव बारगळला. परंतु, त्याचवेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी हे रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद केले जाईल, असे स्पष्ट केले होते. नागरिकांनी त्याला होकार दिला होता.

10 मार्चपासून रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्यात आले. त्यावेळी ‘तरुण भारत’ने पुढील काळात निर्माण होणारे धोके मांडले होते. त्यावेळी कोणत्याही नागरिकाने आक्षेप घेतला नाही. परंतु, सध्या मात्र या ठिकाणची परिस्थिती दयनीय होत चालली आहे. रेल्वे फाटकाच्या खालून मागील दोन महिने नागरिकांची ये-जा सुरू होती. आता त्या ठिकाणी भिंत बांधली जात असल्याने ही वाहतूकही ठप्प होणार आहे. या परिसरात अनेक ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित दुकाने होती. त्यांना रेल्वेगेट बंद झाल्याने मोठा फटका बसला. विशेषत: तानाजी गल्ली परिसरातील दुकानदारांना याचा सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. व्यवसाय कमी झाल्याने अखेर काहींनी दुकाने विक्रीस काढली आहेत. तर काहींनी रिकामी करून भाड्याने देणे पसंत केले आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या खालील व्यापाऱ्यांची जी परिस्थिती झाली तशीच परिस्थिती तानाजी गल्ली रेल्वेगेट खालील व्यापाऱ्यांची आज झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.