निर्बंध जंगलात पर्यटकांचा वावर
विनापरवाना युवकांची घुसखोरी : वन्यप्राण्यांना धोका, कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : खानापूर तालुक्यातील भीमगड वन्यजीव अभयारण्यात विनापरवाना फिरणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वन्यजीवांनाही धोका निर्माण होऊ लागला आहे. वन्यप्रदेशातील धबधब्यांवर मौजमस्ती करण्यासाठी युवक-युवती नियमांचे उल्लंघन करून फिरत आहेत. हीच मौजमस्ती त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. वनखाते अशांवर आळा घालणार का? असा प्रश्नही पर्यावरणप्रेमींनी केला आहे. भीमगड 19 हजार हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे. विशेषत: या वनक्षेत्रात वाघ, बिबटे, अस्वल, हत्ती, गवी रेडे, हरीण आणि इतर वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. त्याबरोबर वन्यजीव कायद्यानुसार जैवविविधता आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र याच अभयारण्यात ट्रेकिंग, प्रीवेडिंग आणि रिलसाठी विनापरवाना जाणाऱ्या युवक व युवतींची संख्या वाढली आहे.
त्यामुळे वन्यप्राण्यांनाही धोका निर्माण होऊ लागला आहे. तरुण विनापरवाना जंगलात उतरत असल्याने त्यांचाही जीव धोक्यात जाण्याची शक्यता आहे. जंगल परिसरात बेकायदेशीरपणे फिरून धबधब्यात आंघोळ करणे, खोल पाण्यात व्हिडिओ शूट करणे, धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेणे असे प्रकार समोर येऊ लागले आहेत. वनक्षेत्रात प्रवेश बंदी असून देखील युवकांकडून घुसखोरी केली जात आहे. अशांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही केली जात आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वनक्षेत्रात असलेल्या धबधब्यांकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. पर्यटकांकडून मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजीचे प्रकारही घडू लागले आहेत.एक वर्षांपूर्वी बेळगाव येथील काही तरुण वनक्षेत्रात उतरले होते. त्यानंतर ते वाट चुकून वनक्षेत्रातच फिरू लागले. त्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची आठ तासानंतर सुटका केली होती. असे प्रकार घडू नये यासाठी डोंगर क्षेत्रात प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र काही तरुण आडवळणी वनक्षेत्रात उतरू लागले आहेत.
अभयारण्यात विनापरवाना उतरणाऱ्यांवर होणार कारवाई
अभयारण्यात विनापरवाना उतरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. वनमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. वनक्षेत्रातील वन्यप्राणी आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.
- मारिया क्रिस्टो राजू डी (उपसंरक्षणाधिकारी, वनखाते)