‘सहनशीलता’ यशस्वी विवाहाचा पाया
सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी : क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देऊ नका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने सुखकर वैवाहिक आयुष्यावरून समुपदेशकाप्रमाणे काही सूचना केल्या आहेत. सहनशीलता आणि सन्मान हे एका यशस्वी विवाहाचे आधार आहेत. क्षुल्लक गोष्टींना फारसे महत्त्व देऊ नका असे न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे.
एका महिलेकडून पतीविरोधात दाखल हुंड्यासाठीच्या छळाच्या तक्रारीचे प्रकरण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. यशस्वी विवाहाचा पाया सहनशीलता, समायोजन आणि परस्परांचा आदर करणे आहे. प्रत्येक विवाहात परस्परांच्या चुकांबद्दल सहनशीलता एका ठराविक मर्यादेपर्यंत असावी. छोटी-मोठी भांडणे आणि मतभेद संसाराचे विषय आहेत. स्वर्गात ठरलेली जोडी नष्ट करण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबिले जाऊ नयेत असे न्यायालयाने म्हटले आहे.
एका विवाहित महिलेचे आईवडिल आणि जवळचे नातेवाईक स्थिती सांभाळणे आणि विवाह टिकविण्याऐवजी क्षुल्लक गोष्टींना मोठे स्वरुप देतात. त्यांच्या या कृत्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवर वैवाहिक बंधन संपुष्टात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा एक निर्देश रद्द केला आहे. एका प्रकरणात पतीने स्वत:विरुद्ध गुन्हेगारी प्रकरण रद्द करण्याची मागणी केली होती. पत्नीकडून नोंद तक्रारीनुसार पती आणि त्याच्या परिवाराच्या सदस्यांनी कथितपणे हुंड्याची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केला होता.