खानापूर तालुक्यातील दुर्गम भागाचा विकास करणार
अंजली निंबाळकर यांचा कणकुंबी, आमटे, चिगुळे, पारवाड भागात प्रचार
खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागाची मला चांगली जाण आहे. मी आमदार असताना विकासासाठी जे काही करता येईल ते केले. मात्र, काही शासकीय अडचणी तसेच काही समस्या केंद्राच्या अधीन असल्याने तालुक्यातील दुर्गम भागाचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. मी खासदार झाल्यास निश्चितच तालुक्याच्या दुर्गम भागाचा कायापालट करणार आहे. यासाठी या भागातील सर्व मतदारांनी माझ्या पाठिशी खंबीरपणे राहून काँग्रेसला मतदान करून मला सेवेची संधी द्यावी, असे आवाहन काँग्रेसच्या कारवार मतदारसंघाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी कणकुंबी, पारवाड भागातील प्रचार दौऱ्यावेळी केले. कणकुंबी, पारवाड, आमटे, माण, चिगुळे, ओलमणी, देवाचीहट्टी, बैलूरसह या भागातील लोकांच्या भेटीगाठी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम कणकुंबी माउली देवीचे दर्शन घेऊन या भागातील प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत कृष्णा नाईक, गोपाळ नाईक, आरती नाईक, अरुण नाईक, उमेश गावडे, उपेंद्र नाईक, दीपक कवठणकर, संजय गावडे, लक्ष्मण कसर्लेकर यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिगुळे येथे प्रचाराच्या दरम्यान महिलांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून काँग्रेसच्या पाठिशी राहण्याचे जाहीर केले. आमटे येथे लक्ष्मण कसर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली संपर्क मोहीम राबविण्यात आली. यावेळी आमटे ग्रामस्थांनीही काँग्रेसला पाठिंबा व्यक्त केला. पारवाड येथे झालेल्या छोट्याशा सभेत निंबाळकर म्हणाल्या, आमदारकीच्या काळात दुर्गम भागाच्या विकासासाठी प्राधान्य दिले होते. मात्र, 30 वर्षे भाजप दिल्लीत नेतृत्व करत होते. त्यांनी या भागाच्या विकासाचा विचारही केलेला नाही. तीस वर्षे मत लुटून स्वत:चाच विकास करण्यात धन्यता मानली आहे. काँग्रेसला विजयी केल्यास दुर्गम भागाचा पर्यटनाभिमुख विचार करून निश्चितच विकास साधला जाईल, असे त्या म्हणाल्या.