तिबेटची ‘आसमान दफन’ परंपरा
माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रथेमध्ये प्रत्येक समाजानुसार मोठे वैविध्य आहे. मृतदेहाचे दहन किंवा दफन अशा दोन प्रक्रिया सर्वसाधारणपणे आढळतात. तिबेटमध्ये यासंबंधातील प्रक्रिया असामान्य आहे. येथे मृतदेहाचे ‘आसमानी दफन’ केले जाते. ही प्रथा वैशिष्ट्यापूर्ण मानली जाते. या परंपरेनुसार मृतदेह कोणत्याही प्रकारे नष्ट केला जात नाही. त्याच्यावर अग्निसंस्कारही केले जात नाहीत, किंवा तो भूमीखाली पुरलाही जात नाही. तो तसाच सडण्यासाठी खुला ठेवला जातो. मृतदेह सडल्यानंतर तो निसर्गाशी एकरुप होतो, अशी भावना या प्रथेमागे आहे. मानव जिथून आला तेथेच त्याला परत पाठवायचे, अशी ही प्रथा आहे. याला आकाशीय दफन प्रक्रिया असे संबोधण्यात येते. माणूस मृत झाल्यानंतर त्याचे शरीर हे केवळ रिकाम्या भांड्याप्रमाणे होते, असेही तिबेटमध्ये मानले जाते. मृतदेह नष्ट करणे म्हणजे त्याच्यावर अन्याय केल्यासारखे आहे, असे येथे मानले जाते. त्यामुळे तो नष्ट न करता तसाच रिकाम्या जागी सोडला जातो. अशा प्रकारे अंत्यसंस्कार करणे हे मोठे पुण्यकर्म मानले जाते. मात्र, ज्यावेळी महामारी उद्भवते तेव्हा मात्र मृतदेह नष्ट केले जातात. ही मृतदेह उघड्यावर सोडण्याची प्रथा तिबेटमधील बहुतेक सर्व समाजांमध्ये प्रचलित असून ती पाळली जाते. अन्य प्रथांचा आधार क्वचित असतो.
पण मृतदेह सडला तरी त्याच्या अस्थि आणि कवटी सडत नाही. त्यामुळे त्यांचे पुढे काय करायचे हा प्रश्न असतो. त्यावरही या परंपरेमध्ये उपाय आहे. मृतदेहाच्या कवट्यांना सोने, चांदी किंवा मौल्यवान रत्नांनी सजविले जाते. त्यानंतर त्यांना मठांमध्ये आसनांवर स्थानापन्न केले जाते. नंतर त्या कवट्यांचा उपयोग रोट्या ठेवण्यासाठी केला जातो. तिबेटमध्ये छोट्या आकाराच्या चपात्या किंवा रोट्या बनविण्याची पद्धत आहे. या रोट्या या कवट्यांमध्ये मावतात. त्यामुळे या कवट्यांचा उपयोग भांडी म्हणून केला जातो, अशी कैक शतकांची प्रथा आहे. मात्र आता चीनच्या प्रशासनाने मृतदेह उघड्यावर सडविण्याच्या प्रथेवर बंदी आणली असल्याने ही प्रथा नामषेश होण्याच्या मार्गावर आहे, असे दिसून येते.