अपहरणकर्त्यांच्या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह तीन पोलीस गंभीर
गोळीबारमध्ये दोन अपहरणकर्तेही जखमी : ‘त्या’ उद्योजकाच्या अपहरणकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांवरच चढविला हल्ला
प्रतिनिधी/ कारवार
जिल्ह्यातील मुंदगोड येथून गुरुवारी रात्री अपहरण करण्यात आलेल्या ‘त्या’ उद्योजकाच्या अपहरणकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असताना अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला चढविला. त्यामुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. तर अन्य काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
अपहरणकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांवर गोळीबार केला. यामध्ये पाचपैकी दोन अपहरणकर्ते जखमी झाले. तर अन्य तीन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हल्याळ रस्त्यावरील डोगीनाळ येथे घडली.
अपहरणकर्त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे मुंदगोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ निलम्मनवर, उपनिरीक्षक परशुराम आणि यल्लापूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल शमीशेख अशी आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या अपहरणकर्त्यांची नावे अजय फकीरप्पा मुडली (वय 25 रा. धारवाड) आणि रहीम जाफरसाब रज्जीबल (वय 27 रा. धारवाड) अशी आहेत. जखमींना उपचारासाठी कारवार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अपहरणकर्त्यांची नावे सागर नागराज कलाल (वय 27 रा. धारवाड), दादामीर अल्लबक्ष (जि. विजापूर) आणि हसन मैनुद्दिन किल्लेदार (वय 29 रा. धारवाड) अशी आहेत. अपहरण करण्यासाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची कारही पोलिसांनी जप्त केली आहे. गुरुवारी रात्री मुंदगोड येथील उद्योजक नजीरसाब दर्गावाले यांचे अज्ञातांनी कारमधून अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी मुंदगोड पोलिसांनी पाच पथकांची रचना केली होती. त्याच रात्री दर्गावाले हावेरी जिल्ह्यातील गदग रिंगरोडवर आढळून आले होते. अपहरणकर्त्यांनी दर्गावाले यांच्या कुटुंबीयांकडे 35 लाखांची मागणी केली होती. त्यातील 18 लाख रुपये दिल्यानंतर दर्गावाले यांना सोडून दिले होते, असेही सांगण्यात येते.
पाच अपहरणकर्त्यांना अटक
अपहरणकर्त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी हल्याळ-यल्लापूर रस्त्यावरील प्रेगीनाळ येथे गाठले. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी मिरची पावडरचा वापर करून पोलिसांवरच हल्ला चढविला. या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यावेळी पोलिसांनी अपहरणकर्त्यांना शरण येण्यास सांगितले. तथापि अपहरणकर्त्यांनी शरण येण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांनी दोन अपहरणकर्त्यांवर गोळीबार करून सर्व पाच जणांना ताब्यात घेतले. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जगदीश आणि डीवायएसपी के. एल. गणेश यांनी यल्लापूर येथील रुग्णालयाला भेट देऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एम. नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.