गोव्यात तीन पाकिस्तानींना भारत सोडण्याचा आदेश
उर्वरित 17 पाकिस्तानींच्या हालचालींवर लक्ष
पणजी : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली असून गोव्यातही दीर्घ आणि अल्पकालीन व्हिसावर आलेले 20 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे समोर आले आहे. यापैकी अल्पकालीन व्हिसावरील तीन नागरिकांना त्वरित देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सुरक्षा व्यवस्थेसंबंधी दिलेल्या निर्देशांनुसार राज्य सरकाराने ही कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय नौदल, गोवा पोलिस आणि भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पर्वरीत मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली.
गोव्यात राहतात 17 पाकिस्तानी
राज्यात अल्पकालीन व्हिसावर आलेले तीन आणि दीर्घ कालावधीच्या व्हिसावर आलेले आणखी 17 पाकिस्तानी नागरिक आहेत. सुरक्षा संस्था त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. रेल्वे आणि बस स्थानकांसह अन्य वर्दळीच्या ठिकाणी संशयास्पद व्यक्तींची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवरही पोलिस खाते लक्ष ठेवून आहे. त्याशिवाय किनारी भागातही कठोर सुरक्षा उपाययोजना वाढविण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्थलांतरिताकडे ओळखपत्र आवश्यक
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज शनिवारपासून राज्यातील स्थलांतरित लोकसंख्या असलेल्या सर्व वस्त्यांमध्ये शोध मोहीम प्रारंभ करण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांना आधारकार्ड किंवा मतदान कार्ड यासारखी ओळखपत्रे सादर करावी लागतील. अशी ओळखपत्रे, वैध पुरावे नसलेल्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येईल. त्याचबरोबर आठवडी बाजारात येणाऱ्या स्थलांतरितांनाही ओळखपत्र बाळगावे लागेल. अन्यथा त्यांना ताब्यात घेतले जाईल. राज्यात गुप्तचर यंत्रणांचे संकलन सुरू झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली व या एजन्सींना लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
ट्रॉलर, कॅनोवरील कर्मचाऱ्यांची तपासणी
किनारी भागातील सुरक्षेकडे लक्ष वेधताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यात 826 मासेमारी ट्रॉलर आणि 1206 कॅनो असल्याचे सांगितले. या जहाजांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कडक तपासणी करण्यात येणार असून भविष्यात त्यांच्यासाठी बायोमेट्रिक्स देखील सुरू करण्यात येईल. राज्यात सहा लँडिंग जेटी आणि 28 रॅम्पवरही कडक तपासणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तपासणी नाक्यावर कडक सुरक्षा
राज्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. पत्रादेवी, मोले आणि पोळे यासह राज्याच्या सर्व सीमा तपासणी नाक्यावरही कडक सुरक्षा व्यवस्था आहे. तरीही आवश्यकता भासल्यास तेथे दिवसा किंवा रात्रीही अचानक नाकाबंदी सुरू करण्यात येईल.
सर्व संशयितांची होणार फेरतपासणी
ज्या लोकांची पीएफआय आणि एसडीपीआय सारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असल्याबद्दल यापूर्वी चौकशी करण्यात आली होती त्यांना पुन्हा तपासणीसाठी पोलिसस्थानकात बोलावण्यात येईल. तसेच हॉटेलवाले आणि बीएनबी खोल्यांना ‘सी फॉर्म’ भरणे यापुढे सक्तीचे असेल, तर कंत्राटदारांना त्यांच्या कामगारांची भाडेकरू पडताळणी करावी लागेल.
जातीय सलोखा राखा : मुख्यमंत्री
शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त गोव्यात राहणाऱ्या काश्मिरी लोकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा. त्यायोगे त्यांना पुरेशी सुरक्षा देणे शक्य होईल, असे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व नागरिकांना जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले.