पाईप फुटून हजारो लिटर पाणी वाया
दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष : दुरुस्तीची जबाबदारी कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.ची की महापालिकेची?
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा जपून वापर करा, ही घोषवाक्ये शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी कायम सांगत असतात. परंतु दररोज एखादी पाणीपुरवठ्याची पाईप फूटून जर दररोज हजारो लिटर पाणी गटारीत वाया जात असूनसुद्धा शासन व लोकप्रतिनिधी हे पाणी बंद करत नसल्याने दररोज पाण्याची नासाडी सुरूच असते. कंग्राळी बुद्रुक येथील कंग्राळी बुद्रुक यमनापूरकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर राजू पावशे घराच्या बाजूकडील चौकामध्ये कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीची जलकुंभ भरण्यासाठी गेलेली पाईप फुटून गेल्या महिन्यापासून दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीमध्ये जात आहे. परंतु याकडे कुणाचे लक्ष नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी सुरूच आहे.
पाईप महानगरपालिकेची की ग्रा. पं. ची?
राजू पावशे यांच्या घरापर्यंतचा भाग बेळगाव महानगरपालिकेत समाविष्ठ झाल्याचेही सांगण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. चे नागरिकांना पिण्यासाठी पाणी साठवण्याचे पूर्वबाजूला दोन जलकुंभ आहेत. सदर दोन जलकुंभामध्ये पाणी साठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर या ठिकाणी पाईप फुटल्यामुळे पाणी वाया जात आहे. तसेच जर ही पाईप महानगरपालिकेची असेल तरीही महानगरपालिका समाविष्ठ नागरिकांच्या नळांना पाणी सुरू केल्यासही पाणी पाईपमधून रस्त्यावरून गटारीला जात आहे. असे या परिसरामधील नागरिकांतून सांगण्यात येत आहे. एकूण बेळगाव महानगरपालिका असो किंवा ग्राम पंचायत असो शासनाचेच पाणी वाया जात आहे.
रोजच्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे ?
शासन पहिलाच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात अपयशी ठरत आहे. त्यातच भरीस भर म्हणून या ठिकाणी रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यातून वाहनांच्या जाण्याच्या वर्दळीमुळे परत या ठिकाणी रस्त्यावर खड्डा तयार होत आहे. तेव्हा सदर पाईप ग्रा. पं.ची असल्यास पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी अथवा महानगरपालिकेची असल्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन फुटलेल्या पाईपची त्वरित दुरूस्ती करून पाण्याची विनाकारण होणारी नासाडी थांबविण्यासाठी ग्रामस्थांतून मागणी करण्यात येत आहे.