यावर्षी दिवाळी चार दिवस ; 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन
यावर्षी 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, मंगळवार दि. 21 रोजी लक्ष्मीपूजन, 22 रोजी दिवाळी-पाडवा आणि 23 रोजी भाऊबीज याप्रमाणे 4 दिवस दिवाळीचे आहेत.
नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रदोषकाळात अमावास्या असून दुसरे दिवशी 21 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून सायंकाळपर्यंत अमावास्या असलेल्या दिवशी धर्मसिंधु, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय इ. ग्रंथांमधील वचनांचा विचार करून मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. 21 ऑक्टोबर रोजीचे लक्ष्मीपूजन धर्मशास्त्रसंमत असून या दिवशी सूर्यास्तापूर्वी अमावास्या संपत असली तरीही मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी व प्रदोषकाळात (सूर्यास्तानंतर सुमारे 2 लाख 24 मिनिटे या कालावधीत) लक्ष्मीपूजन करावे. महाराष्ट्र दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णयसागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील 100 पेक्षा अधिक पंचांगात आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्येसुद्धा 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरत आहात, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.
दिवाळीतील दिवसांची माहिती
वसुबारस ( शुक्रवार, 17 ऑक्टोबर)
या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात. तत: सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते। मातर्ममभिलषितं सफलं कुरू नन्दिनी।।
अर्थ- हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात. अशा वेळेस गाय-वासराच्या मूर्तीचीदेखील पूजा करता येते. तेही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. मात्र, अशा वेळेस गाईच्या गोग्रासाकरिता म्हणून आपल्या भागातील गो-शाळेस शक्य ते सहकार्य करावे.
धनत्रयोदशी, यमदीप दान (शनिवार, 18 ऑक्टोबर)
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीप दान केले जाते. घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजे अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा. मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह। त्रयोदश्यां. दीपदानात् सूर्यज: प्रीयतां मम।।
नरक चतुर्दशी (सोमवार, 20 ऑक्टोबर)
नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे. शरद ऋतुचा शेवट आणि हेमंत ऋतुचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला खालील 14 नावांनी तर्पण करून याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे. 1) यम, 2) धर्मराज, 3) मृत्यू, 4) अंतक, 5) वैवस्वत, 6) काल, 7) सर्वभूतक्षयकार, 8) औदुंबर, 9) दध्न, 10) नील, 11) परमेष्ठिन, 12) वृकोदर, 13) चित्र, 14) चित्रगुप्त.
लक्ष्मीकुबेर पूजन (मंगळवार, 21 ऑक्टोबर)
शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारीवर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते. नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये। या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्त्वदर्चनात्।। अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच। भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पद:।। अशी कुबेराची प्रार्थना करावी. या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.
लक्ष्मीपूजन मुहूर्त : मंगळवार, 21 ऑक्टोबर- दुपारी 3 ते 4.30, सायंकाळी 6 ते 8.30, रात्री 10.30 ते 12.00 बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा,बुधवार, 22 ऑक्टोबर)
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितले आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नावे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते.
वहीपूजन मुहूर्त (बुधवार, 22 ऑक्टोबर)- पहाटे 3.00 ते 6.00, सकाळी 6.30 ते 9.30, सकाळी 11.00 ते 12.30
यमद्वितीया (भाऊबीज, गुरुवार,23 ऑक्टोबर)
नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीजसुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले आहे. दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण-उत्सव यांच्याप्रमाणे दिवाळीचे स्वरुप नसते. सर्व समाजाने दु:ख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात राहावयाचे असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात. पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात-कुटुंबात एकोपा राखला जातो. प्रत्येक धर्मियांच्या सण-उत्सवांमुळे संपूर्ण भारतात खरेदी-विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते. अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगती होण्यास या सण-उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते, ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.
- मोहन दाते (दाते पंचांगकर्ते)