ही समर्थ भारताची ‘प्राणप्रतिष्ठा’ ठरावी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार, हा क्षण सहस्रावधी वर्षे राहील स्मरणात
भगवान रामलल्लांच्या मूर्तीची भव्य अयोध्येच्या रामजन्मभूमीस्थळी साकारत असलेल्या भव्य राममंदिरातील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा नव्या युगाचा देदिप्यमान प्रारंभ आहे. या ऐतिहासिक क्षणी आपण सर्वांनी भव्य, दिव्य आणि सामर्थ्यवान भारताच्या निर्मितीचा निर्धार केला पाहिजे. पाचशे वर्षांहून अधिक काळाचा संघर्ष या क्षणी फलद्रूप होत आहे. हा क्षण केवळ विजयाचा नव्हे, तर विनयाचाही आहे, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, प्राणपतिष्ठा समारंभानंतर, देशाला उद्देशून केलेल्या भाषणात काढले आहेत. सोमवारी त्यांच्या हस्ते राममंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
या पवित्र आणि मंगल क्षणी आपण साऱ्यांनी भारताच्या पुढच्या 1 सहस्र वर्षांच्या प्रगतीचा पाया घालावयास हवा. हे केवळ एक राममंदिर नाही, तर भारताच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रतीक आहे. आता आपण सर्वांनी राममंदिराच्या निर्माणकार्याच्या पलिकडे जाऊन सामर्थ्यवान भारताच्या निर्मितीचा विचार केला पाहिजे. हा क्षण आपल्या सर्वांना देशनिर्मितीच्या कार्याला वाहून घेण्याची प्रेरणा सदैव देत राहील, असे जोषपूर्ण प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
हा रोमांचक अनुभव
साऱ्या देशाचे श्रद्धास्थान असणाऱ्या भगवान रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा साक्षीदार होणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा क्षण आहे. हा समारंभ पूर्ण झाल्यानंतरही मी अद्याप त्याच परमोच्च आनंदात मग्न आहे. ही अनुभूती विलक्षण आहे. तिचे शब्दांमध्ये वर्णन करता येणे केवळ अशक्य आहे. या दिव्य अनुभवाची स्वर्गीय स्पंदने अद्यापही मला रोमांचित करीत आहेत. रामजन्मभूमीच्या स्थानी मंदिराची निर्मिती आणि गर्भगृहात झालेली ही प्राणप्रतिष्ठा यांच्यामुळे साऱ्या भारतीयांची शेकडो वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे. राममंदिराने सर्वांच्या अंत:करणात नवी ऊर्जा ओतली आहे, असेही विचार त्यांनी मांडले.
वर्षानुवर्षे स्मरणात राहील...
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा प्रेरणादायी क्षण सहस्रावधी वर्षे सध्याच्या आणि भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. आपण सर्वजण याची देही याची डोळा या क्षणाचे साक्षीदार झालो, हे आपले परमभाग्य आहे. या भव्य आणि दिव्य सोहळ्याशी केवळ भारतच नव्हे, तर सारे जग जोडले गेले आहे. अयोध्येत ज्याप्रमाणे हा महोत्सव साजरा होत आहे, त्याचप्रमाणे तो जगातही अनेक स्थानी साजरा होत आहे, ही देखील गौरवाची बाब आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभू रामचंद्र हे ऊर्जास्रोत
प्रभू रामचंद्र हे आमचा श्वास आहेत. ते आमचा विश्वास आहेत. ते भारताचे अधिष्ठान आहेत. भारताची अस्मिता आहेत. भारताचे वैभव आहेत. भारताचा महिमा आहेत आणि भारताची जाणीवही तेच आहेत. साऱ्या भारतावर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचे स्मरण चिरस्थायी आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
श्रीराम आग नव्हे, तर ऊर्जा
प्रभू रामचंद्र हे पराक्रमी होते. पण ते आग नव्हेत. तर ते ऊर्जा आहेत. ते समस्या नाहीत, तर ते समस्येवरचा तोडगा आहेत. ते शांतता, चेतना, धैर्य, संयम, सौख्य आणि परस्पर विश्वास यांचे प्रतीक आहेत. ते केवळ वर्तमान नाहीत, तर अनादी अनंत आहेत, असे प्रभू रामचंद्रांचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.