For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिवाड येथे चोरट्यांनी पळविले शेडवरील पत्रे

10:58 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
अतिवाड येथे चोरट्यांनी पळविले शेडवरील पत्रे
Advertisement

शिवारातील घटनेमुळे खळबळ : शेतकऱ्याला मोठा फटका : रेशीम शेतीचे नुकसान

Advertisement

बेळगाव : अतिवाड येथे रेशीम शेतीसाठी उभारलेल्या शेडवरील पत्रे चोरट्यांनी पळविले आहेत. शुक्रवारी रात्री हा चोरीचा प्रकार घडला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेडवरील तब्बल 28 पत्रे चोरले आहेत. त्यामुळे रामदास यल्लाप्पा पाटील या शेतकऱ्याला 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. सोमवारी सकाळी शेताकडे गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. रामदास पाटील यांनी आपल्या शेतामध्ये रेशीम शेतीसाठी शेडची उभारणी केली होती. या शेडवर पत्रे टाकले होते. ते चोरट्यांनी  पळविल्याने सर्व शेडच उघडे पडले आहे. परिणामी रेशीम शेतीलाही धोका निर्माण झाला आहे. गावात वेगळा प्रयोग म्हणून त्यांनी रेशीम शेती केली आहे. मात्र चोरट्यांच्या उपद्रवामुळे त्यांना फटका बसला.

युवकांचे खच्चीकरण

Advertisement

शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन, मत्स्यपालन व रेशीम शेतीकडे युवक वळू लागले आहेत. मात्र चोरीच्या घटना वाढू लागल्याने युवकांचे खच्चीकरण होऊ लागले आहे. शेडवरील पत्र्याच्या चोरीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  चोरट्यांनी आता मंदिर, घरे याबरोबर आता शेतातील साहित्य लक्ष्य केले आहे.

चोरट्यांच्या मुसक्या आवळा

सदर घटनेची माहिती काकती पोलिसांना दिली. पोलीस घटनेबाबत पुढील तपास करणार आहेत. दरम्यान ग्राम पंचायत सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी, गोपाळ पाटील यांनी पाहणी केली. अलिकडे रेशीम शेतीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यासाठी शेडची उभारणीही केली जात आहे. मात्र असे चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या तरुणांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणीही होत आहे. यंदा पावसाअभावी पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी दुष्काळी संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेडवरील सर्वच पत्रे चोरी गेल्याने रामदास पाटील हताश झाले आहेत. घटनेचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणीही होत आहे.

बसस्थानकात चोऱ्या : प्रवाशांत भीती : सतर्क राहणे आवश्यक : किमती ऐवज लंपास

प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या संधीचा फायदा घेवून चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. बस स्थानकात दिवसाढवळ्याही चोरटे खुलेआम चोरी करू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. चोरट्यांना आळा घालावा, अशी मागणीही प्रवाशांतून होत आहे. सौंदत्ती रेणुकादेवीचे दर्शन घेऊन बेळगाव बस स्थानकावर परतलेल्या एका प्रवाशाची विसरलेली बॅग चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल आणि इतर किंमती ऐवज होता. याबरोबर दररोज लहान, सहान चोऱ्या वाढल्या आहेत. बस स्थानकात असलेले सीसीटीव्हीही कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे राजरोस चोरीचे प्रकार घडू लागले आहेत. शक्ती योजनेमुळे प्रवाशांची वाढली आहे. या संधीचा फायदा घेवून प्रवासा दरम्यानही महिलांचे सोने, चांदी व किंमती ऐवज पळवत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रवाशांनी साहित्याची काळजी घेणे आवश्यक

विविध मार्गावर प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी गर्दी होवू लागली आहे. या गर्दीतच गळ्यातील सोने, चांदी, इतर ऐवज हिसकावून घेतला जात आहे. तर काहीवेळा बॅग आणि पर्सही पळविली जात आहे. त्यामुळे प्रवाशांनीही खबरदारी घेवून सतर्क राहणे गरजेचे आहे. यात्रा व लग्नसमारंभ वाढले आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र अशा परिस्थितीत बसमध्ये चोऱ्यांचे प्रकारही वाढू लागले आहेत. प्रवासादरम्यान बॅग आणि बॅगमधील रोख रक्कम, एटीएम आणि इतर ऐवजही एका क्षणात नाहीसा केला जात आहे.

Advertisement
Tags :

.