हे उपजे आणि नाशे । ते मायावशे दिसे ।
अध्याय दुसरा
आपण कर्ते आहोत हे अर्जुनाचे अज्ञान भगवंतांनी दूर करायचे ठरवले. ते म्हणाले, तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती तुझ्या चित्ताला झाली आहे. ही सगळी सृष्टी अनादिसिद्ध म्हणजे पूर्वापार चालत आलेली असून हे सगळे आपोआप घडते व मोडते. हे जन्ममृत्यु तू उत्पन्न केले आहेस का? आणि तू मारशील तरच हे मरतील असे आहे का? तू यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर हे चिरंजीव होणार आहेत का? जन्म, मृत्यु ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहोंबद्दलही शोक करत नाहीत. ह्या अर्थाचा
करिसी भलता शोक वरी ज्ञान हि सांगसी । मेल्या-जित्यावीषी शोक ज्ञानवंत हि जाणती
।। 11 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार जन्म व मृत्यु ह्या दोन्हीचाही अनुभव आपण वस्तुस्थिती लक्षात न घेतल्यामुळे घेत असतो. त्यामुळे ज्याची चिंता करू नये, त्या गोष्टींची मनुष्य चिंता करतो, मनात आणू नये ते आणतो. ही सगळी तात्पुरती व्यवस्था असते. प्राण्यांच्या देहात असलेला आत्मा मात्र कायम टिकणारा असतो.
आपल्या बोलण्याची पुष्टी करण्यासाठी भगवंत पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, अर्जुना, तू मी आणि हे सर्व राजे पूर्वी नव्हतो, हल्ली आहोत पण पुढे कधीच नसणार आहोत.
मी तू आणिक हे राजे न मागे नव्हतो कधी । तसे चि सगळे आम्ही न पुढे हि नसू कधी ।। 12 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, पाहा येथे जमलेले मी, तू आणि हे राजे आत्ता आपण जसे आहोत तसेच निरंतर राहू किंवा आपला नाश होईल याची चिंता सोड, कारण मुळामध्ये ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. मायेमुळे, जन्म आणि मृत्यू हे अनुभवास येतात, एरव्ही आत्मवस्तु आहे तशीच राहते. तुला एक उदाहरण देतो. समजा वाऱ्याने पाणी हलवले, त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले तर त्यात कोणाचा व कुठे जन्म झाला असे होईल का? पुढे वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर कशाचा नाश झाला असे वाटेल का? तरंगाचे निर्माण होणे आणि त्याचे नाहीसे होणे हे दोन्ही तात्पुरते असते तसेच मनुष्य जन्मणे आणि मरणे हेही तात्पुरतेच असते.
पुढील श्लोकात ते म्हणतात, ज्याप्रमाणे देहाला बालपण, तरुणपण आणि म्हतारपण ह्या अवस्था आपोआप प्राप्त होतात तसेच आयुर्मान संपले की मृत्यू येतो. शरीराला जरी निरनिराळ्या अवस्था प्राप्त होत असल्या तरी त्यात असलेला आत्मा मात्र आहे तसाच असतो. सध्याचा देह नाश पावल्यावर त्याला दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते. त्याला जन्म आणि मृत्यू दोन्हीही नसल्याने आत्मा हा अविनाशी आहे हे जो जाणतो तो धैर्यवान विद्वान पुरुष जन्ममरणाच्या कल्पनेने डगमगत नाही.
ह्या देही बाल्य तारूण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ।। 13 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत म्हणाले, शरीर तर एकच आहे पण वयपरत्वे त्याला बाल्य, तारूण्य व म्हातारपण अशा अवस्था प्राप्त होतात, माझ्या म्हणण्याचा हा प्रत्यक्ष पुरावा आहे. देहावर पाहिल्याने बालपण दिसते, मग तारुण्यात बालपण नाहीसे होते, नंतर वृद्धावस्था येते. हे शरीर थकले की, चैतन्ययुक्त आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे जो जाणतो त्याच्या वाट्याला गैरसमजातून होणारे दु:ख कधीही येत नाही. सामान्य मनुष्य हे जाणत नाही कारण त्याला समोर दिसतंय तेच खरं वाटत असतं. त्याचे डोळे त्याला जे दाखवतायत तेच तो खरे मानतो. कान, नाक, डोळे त्वचा आणि जीभ ही ज्ञानेंद्रिये त्याच्या अंत:करणावर राज्य करतात म्हणून त्याला मी म्हणजे हे शरीर असा भ्रम होतो.
क्रमश: