यंदा आंबा उत्पादनात होणार वाढ
बागायत खात्याची माहिती : प्रतिहेक्टर चार ते पाच टन उत्पादन अपेक्षित
बेळगाव : पोषक वातावरणामुळे यंदा आंबा उत्पादनात अपेक्षित वाढ होईल, असा अंदाज बागायत खात्याने वर्तविला आहे. पावसाचा अभाव, तापमानात झालेली वाढ आदी कारणांमुळे सर्व पिकांना फटका बसला आहे. मात्र, याला आंबा अपवाद असून उत्पादनात समाधानकारक वाढ होईल, अशी अपेक्षा बागायत खात्याने व्यक्त केली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आंब्याची लागवड सर्वत्र दिसत आहे. तर काही ठिकाणी आंबा विक्रीस दाखल झाला आहे. पोषक वातावरणामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी 4 ते 5 टन आंब्याचे प्रतिहेक्टर उत्पादन वाढेल, असा अंदाज बागायत खात्याने वर्तविला आहे. आंब्याचे उत्पादन एक वर्ष वाढले तर दुसऱ्या वर्षी घटते. गतवर्षी जिल्ह्यात आंब्याच्या उत्पादनात घट झाली होती. यंदा आंबा उत्पादनात अपेक्षित वाढ होईल, असा अंदाजही बागायत तज्ञांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन खानापूर तालुक्यात होते. त्यानंतर बेळगाव आणि कित्तूरचा नंबर लागतो. त्याचबरोबर अलीकडे बैलहोंगल, हुक्केरी आणि गोकाक तालुक्यामध्येही आंबा लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. जिल्ह्यात 3600 हेक्टर क्षेत्रात आंबा बागायत क्षेत्र आहे. त्यामध्ये हापूस, केशर, अल्फान्सो आदी आंब्यांच्या जातींचा समावेश आहे. जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक बागायत शेतकरी आहेत. अलीकडे त्यामध्ये भर पडली आहे. विशेषत: द्राक्षे, डाळींब, चिकू, पेरू, केळी, पपई, काजू, आंबा, फणस आदी फळांचे उत्पादन होते. अलीकडे बागायत क्षेत्र वाढल्याने साहजिकच उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. यंदा पूरक वातावरणामुळे आंबा उत्पादनात दुपटीने वाढ होईल, असा विश्वास बागायत खात्याने व्यक्त केला आहे.
पोषक वातावरणामुळे आंबा उत्पादनात वाढ होईल
यंदा कमी पाऊस झाला असून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पोषक वातावरणामुळे आंबा उत्पादनात वाढ होईल. आंबा बागायतीमध्ये झाडांना मोहोर आला आहे. तर काही ठिकाणी लागवडही सुरू झाली आहे. एकूणच उत्पादनात वाढ होईल.
-महांतेश मुरगोड (बागायत खाते, सहसंचालक)