आघाडीला ‘इंडिया’ नाव देण्यास होता विरोध! नितीश कुमार यांचा खुलासा
विरोधी पक्षांवर बरसले नितीश कुमार : राहुल गांधींना दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलिकडेच राजदची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी विरोधी पक्षांच्या कथित ऐक्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. मी प्रारंभापासूनच विरोधी पक्षांच्या आघाडील्‹ ‘इंडिया’ नाव देण्याच्या विरोधात होतो, परंतु माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मी दुसरे नाव सुचविले होते, परंतु विविध पक्षांच्या नेत्यांनी ‘इंडिया’ हे नाव ठेवले. आता इंडिया आघाडीची स्थिती काय होतेय हे लोकांसमोरच आहे. आम्ही आता जुन्या सहकाऱ्यासोबत (भाजप) आलो असून आता कायमस्वरुपी त्यांच्यासोबतच राहू असे उद्गार नितीश कुमार यांनी काढले आहेत.
विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव इंडिया नको असे आमचे म्हणणे हेते. हे नाव योग्य नसल्याचे आम्ही स्पष्ट केले होते. आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने या आघाडीची स्थिती पहावी. एक काम या आघाडीकडून होत नव्हते. कुठला पक्ष किती जागा लढविणार हे देखील आजवर ठरविण्यात आलेले नाही. याचमुळे आम्ही या आघाडीला रामराम ठोकला. आम्ही आता केवळ बिहारच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे वक्तव्य नितीश कुमार यांनी केले आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहारमध्ये जातनिहाय सर्वेक्षण माझ्या सांगण्यावरून नितीश कुमार यांनी करविले होते असा दावा केला होता. याप्रकरणी आता नितीश कुमारांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी हे उगाच श्रेय घेऊ पाहत आहेत. जातनिहाय सर्वेक्षण आम्ही करविले होते असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
9 पक्षांच्या उपस्थितीत जातनिहाय सर्वेक्षण करविले आहे. 2019 आणि 2020 मध्ये विधानसभेपासून सार्वजनिक बैठकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी जातनिहाय सर्वेक्षण करविण्याची भूमिका मांडली होती. यानंतर 2021 मध्ये पंतप्रधानांचीही भेट घेतली होती. सर्व पक्षांच्या सहमतीद्वारे जातनिहाय सर्वेक्षण करविले होते. त्यावेळी विरोधी पक्ष दुसऱ्या बाजूला होते, त्यांच्याशीही चर्चा केली होती. आता या कार्याचे कुणी श्रेय घेऊ पाहत असल्यास तर त्याला अर्थ नसल्याचे नितीश यांनी म्हटले आहे.
लालूंच्या काळातील जंगलराजचा उल्लेख
2005 पूर्वी लालूप्रसाद यादवांच्या शासनकाळात बिहारची स्थिती काय होती हे सर्वांना माहित आहे. कुणी घरातून बाहेर पडण्याचेही धाडस करत नव्हतो. राज्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय होती. कुठेच कोणत्याही प्रकारचा पूल निर्माण केला जात नव्हता. तेजस्वी यादव हे अजून लहान आहेत, त्यांना फारशी माहिती नाही. कुठलेही लहान मूल काही म्हणत असेल तर फारसे मनावर घेऊ नये असे म्हणत नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींची टिप्पणी
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर उपरोधिक टीका केली होती. नितीश कुमार हे किंचित दबाव देखील झेलू शकत नाहीत. किंचित दबाव आला तरीही यूटर्न घेतात. बिहारमध्ये जातनिहाय सर्वेक्षण माझ्याच दबावामुळे झाले. बिहारच्या जनतेला इंडिया आघाडीने सामाजिक न्यायाचे आश्वासन दिले होते. जातनिहाय सर्वेक्षण करवावे लागणार असल्याचे आम्ही नितीश कुमार यांना स्पष्ट केले होते. यानंतर राजद आणि काँग्रेसने दबाव निर्माण करत जातनिहाय सर्वेक्षण करविले होते असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.