अद्यापही जिल्ह्यात ९२ गावांत पाणीटंचाई
खासगी कूपनलिका भाडेतत्त्वावर घेऊन 84 गावांना टँकरने होतोय पाणीपुरवठा
बेळगाव : दुष्काळामुळे यंदा सर्वांच्या नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागून राहिल्या होत्या. गेल्या आठवडाभरात पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रशासनासह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अद्याप जिल्ह्यामध्ये 92 गावांमध्ये पाणीटंचाई असून 84 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाला यंदा जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे. पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली आहे. खासगी कूपनलिका भाडेतत्त्वावर घेऊन पाणीपुरवठा करावा लागला आहे. तर खासगी टँकरांचीही मदत घ्यावी लागली आहे. जिल्ह्यातील अथणी तालुक्यामधील बहुतांश गावांना पाणी समस्येला सामोरे जावे लागले आहे. सध्या जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 92 गावांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. सदर गावांना कूपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
यासाठी भडेतत्त्वावर कूपनलिका घेण्यात आल्या आहेत. अथणी तालुक्यातील 30, चिकोडी 12, रायबाग 28, गोकाक 4, हुक्केरी 1, खानापूर 3, मुडलगी 6 अशा प्रकारे 84 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 92 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून सदर गावांना भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. अथणी तालुक्यामध्ये 57 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चिकोडी 12, गोकाक 4, रायबाग 39, मुडलगी 8, खानापूर 3, हुक्केरी 1 अशा प्रकारे 124 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाणी समस्या लक्षात घेत जिल्हा प्रशासनाकडून ग्राम पंचायतींना यापूर्वीच पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ग्राम पंचायतींनी खासगी कूपनलिका भाडेतत्त्वावर घेऊन पाणीपुरवठा केला आहे. बैलहोंगल तालुक्यात 14, बेळगाव 11, चिकोडी 1, खानापूर 6, रामदुर्ग 8, सौंदत्ती 1, कित्तूर 3, मुडलगी 1 अशा प्रकारे 45 कूपनलिका भाडेतत्त्वावर घेऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांत दमदार हजेरी लावली आहे. पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून काही भागात पाण्याची सोयही झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.