देशात कुठलीच ‘राम’ लाट नाही
प्राणप्रतिष्ठेनंतर राहुल गांधींचा दावा : आसाम मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
देशात कुठलीच ‘राम’ लाट नसल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आसामच्या गुवाहाटी येथे केला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम होता अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर आसाममध्ये न्याय यात्रेविरोधात एफआयआर नोंद केल्याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्यावर निशाणा साधला आहे.
रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा एक राजकीय कार्यक्रम होता असे म्हणत राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशात निर्माण झालेल्या ‘लाटे’चा सामना कसा करणार या प्रश्नाला उत्तर दिले आहे. देशात राम लाट नाही. हा एक भाजपचा राजकीय कार्यक्रम होता आणि नरेंद्र मोदींनी तेथे एक सोहळा, एक शो केला असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
आमच्या यात्रेदरम्यान कुठेच निदर्शने झाली नाहीत. भाजपचे लोक माझ्या दिशेने हात उंचावत होते, मी त्यांच्या दिशेशने फ्लाइंग किस देत होतो. आमची न्याय यात्रा रोखून आसामचे मुख्यमंत्री एकप्रकारे आम्हाला मदतच करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
आम्ही मागीलवेळी भारत जोडो यात्रा काढली होती, तेव्हा या यात्रेचा कुठलाच प्रभाव पडणार नाही असे भाजप म्हण होतो. परंतु कन्याकुमारीहून सुरू झालेल्या यात्रेने यशाचे विक्रम गाठले होते. याचमुळे यंदा सुरू झालेल्या यात्रेत अडथळे निर्माण केले जात आहेत. परंतु या विरोधाचा कुठलाच प्रभाव पडणार नाही. आम्हाला महाविद्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले, परंतु विद्यार्थीच महाविद्यालयाबाहेर आले आणि मी त्यांना संबोधित केले. हे लोक बजरंग दलाची यात्रा रोखत नाहीत, परंतु आम्ही यात्रा रोखत असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.
जागावाटपावरून चर्चा सुरू
न्याययात्रा लवकरच बंगालमध्ये दाखल होणार आहे. तेथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या यात्रेत सामील होणार का असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. यावर ममता बॅनर्जी यांना आम्ही निमंत्रण पाठविले असून त्या सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल. पश्चिम बंगालमधील जागावाटपासंबंधी आमची ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षातील काही लोकांनी एखादे वक्तव्य केल्यामुळे आमचे संबंध बिघडणार नाहीत असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. एकीकडे नरेंद्र मोदी-संघ आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारसरणी आहे. आज इंडिया आघाडीकडे देशातील जवळपास 60 टक्के मते आहेत असा युक्तिवाद राहुल यांनी केला आहे.
एफआयआर नोंद व्हावा
आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेवरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. आसाममधील राज्य सरकारने यात्रेला गुवाहाटीतील मुख्य रस्त्यांवरून जाण्याची अनुमती दिलेली नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करत बॅरिकेड्स तोडले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी मंगळवारी राज्य पोलीस महासंचालक जी.पी. सिंह यांना जमावाला भडकविल्याप्रकरणी राहुल गांधी विरोधात एफआयआर नोंद करण्याचा निर्देश दिला आहे.