प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते!
भविष्यात भारताची भूमिका शक्य : इराण-अमेरिका मध्यस्थीवर राजनाथ सिंहांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ बर्लिन
पश्चिम आशियात जारी तणावादरम्यान भारताच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य समोर आले ओह. जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सद्यस्थितीत भारत थेट मध्यस्थी करत नसला तरीही भविष्यात याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. भारताने स्वत:च्या वतीने प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांनी दोन्ही बाजूंना युद्ध समाप्त करण्याचे आवाहन केले आहे. परंतु प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, पुढील काळात ही वेळ येऊ शकते, तेव्हा भारत स्वत:ची भूमिका बजावेल आणि त्यात यशही मिळू शकेल असे उद्गार राजनाथ यांनी काढले आहेत.
पाकिस्तानात अमेरिका आणि इराणदरम्यान चर्चेचे प्रयत्न फारसे यशस्वी होत नसताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. अशास्थितीत आता तिसरा देश याप्रकरणी पुढाकार घेऊन स्थिती सांभाळू शकतो का यावर सर्वांची नजर असणार आहे.
कूटनीतिक प्रकरणांमध्ये भारताची भूमिका संतुलित राहिली आहे. पंतप्रधान मोदींचा दृष्टीकोन नेहमीच संतुलन आणि चर्चेवर आधारित राहिला आहे. युद्ध लवकर संपावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी हीच भारताची इच्छा असल्याची भूमिका राजनाथ सिंह यांनी मांडली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत येणारे अडथळे भारतासाठी थेट प्रभाव पाडणारे आहेत. आमच्या ऊर्जा गरजांचा मोठा हिस्सा पश्चिम आशियातून येतो, अशास्थितीत तेथील कुठलेही संकट आमच्यासाठी महत्त्वाचे ठरते. सद्यकाळात कुठल्याही क्षेत्रीय संकटाला केवळ एका भागापुरती मर्यादित मानले जाऊ शकत नाही. याचे परिणाम पूर्ण जगावर होतात, भले मग ती ऊर्जा सुरक्षा असो, अन्नसुरक्षा असो किंवा आर्थिक स्थिरता असे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.